Nanded farmers protest pudhari photo
नांदेड

Nanded farmers protest : शेतकरी पुत्रांची दुष्काळी दहीहंडी; सत्ताधाऱ्यांच्या जल्लोषाला चपराक !

'पाऊस पडू दे, शेतकरी वाचू दे'अशी आर्त हाक देत श्रीकृष्णाला साकडे

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात भाजपासह सत्तेतल्या पक्षांकडून दहीहंडीच्या निमित्ताने लाखो रूपयांची उधळण व नाचगाण्यांचा जल्लोष सुरू असताना खा. अशोक चव्हाण यांच्या प्रभावक्षेत्रातील शेतकरी पुत्रांनी रविवारी दुपारी दुष्काळी दहीहंडी फोडून सत्ताधाऱ्यांच्या दिखाव्याला चपराक देतानाच जिल्ह्यातील विदारक दुष्काळी परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधले.

जिल्ह्यातील शेतकरी व त्यांच्या पुत्रांनी अर्धापूर तालुक्यातील भोकर फाटा येथे रविवार १३ सप्टेंबर सकाळी ११ वाजता एकत्र येत आपल्या शेतातील सुकलेले सोयाबीन, कापूस आणि खराब झालेल्या केळींचा काला करून दहीहंडी साकारली. 'पाऊस पडू दे, शेतकरी वाचू दे'अशी आर्त हाक देत श्रीकृष्णाला साकडे घालण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. दुष्काळाची दाहकता सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी पारंपरिक उत्सवाला संघर्षाचे स्वरूप देण्यात आले.

१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात यावी, मराठवाड्याचा अनुशेष भरून काढावा, संपूर्ण कर्जमाफी करावी, वैधानिक विकास महामंडळाचे पुनर्गठन करून अध्यक्ष नेमावा, पीकविम्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा आणि मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील राजेगोरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख, काँग्रेसचे संदीपकुमार देशमुख, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील वानखेडे, सदाशिवराव देशमुख, दादाराव पुयड, पिंटू पाटील वासरीकर, संतोष गव्हाणे, दीपक मगर, भगवानराव मनूरकर, शंकरराव राजेगोरे, मधुकर राजेगोरे, मारोतराव भांगे, भगवान पवार, किसनराव कदम, अशोक बुटले, बाळासाहेब आंबेगावकर, डॉ. उत्तमराव इंगळे, सदाशिव इंगळे, नितेश लोणे, विठ्ठल कल्याणकर, महेश राजेगोरे आदी उपस्थित होते.

मराठवाड्याच्या कायमस्वरूपी दुष्काळमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

१७ सप्टेंबरच्या अनुषंगाने मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन दुष्काळी उपाययोजनांना गती द्यावी, मराठवाड्याचा अनुशेष भरून काढावा, वैधानिक विकास महामंडळाचे पुनर्गठन करावे आणि मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे, मुदखेड काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख आणि काँग्रेस कार्यकर्ते संदीपकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT