नांदेड; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज (ता.२१) आनलाईन जाहीर केला. त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा निकाल ८९.७४ टक्के इतका लागला असून, त्यात गतवर्षीच्या तुलनेत एक टक्क्याने वाढ झाली आहे.
करिअर निवडण्यासाठी बारावीचेवर्ष महत्त्वाचे असते. त्यामुळे बारावीचे वर्ष सुरु झाल्यापासून ते परीक्षेचा निकाल जाहीर होईपर्यंत कुटुंबात विद्यार्थ्यासह सर्वचजण काळजीत असतात. त्यामुळे या परीक्षेच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. मंगळवारी बोर्डाने निकाल आनलाईन जाहीर केला.
यंदा जिल्ह्यातून ४२ हजार ४६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४१ हजार ८७१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. त्यापैकी ३७ हजार ५७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये १९ हजार ८३८ मुले तर १७ हजार ७४० मुलींचा समावेश आहे. ५९३ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली.
कॉपीला आळा घालण्यासाठी यावर्षी शिक्षण विभागातर्फे पावले उचलली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षा देता आली. परिणामी, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्क्याने जिल्ह्याचा निकाल वाढला.
– माधव सलगर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)