किनवट : शासकीय विश्रामगृहातील स्वयंपाकगृहात काम करणाऱ्या आदिवासी महिलेचा विनयभंग करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याच्या तक्रारीवरून किनवट पोलिसांनी बालाजी केंद्रे (रा. कोपरा, ता. किनवट) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास संबंधित महिला शासकीय विश्रामगृह, गोकुंदा येथील स्वयंपाकगृहात काम करीत असताना आरोपी तेथे आला. त्याने महिलेकडे पाहून आक्षेपार्ह वक्तव्ये करीत शरीरसुखाची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास आरोपीने पुन्हा स्वयंपाकगृहात येऊन महिलेचा हात बळजबरीने पकडत आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५ (२) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ मधील कलम ३(१)(डब्लू)(आय) व ३(१)( डब्लू)(आय आय) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम तपास करीत आहेत.