बाळासाहेब पांडे
नायगाव : उमरी-नायगाव या शंभर कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी सिमेंट रस्ता प्रकल्पातील वाद थांबण्याचे नाव घेत नसतानाच आता आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. पाटबंधारे विभागाच्या कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय नायगाव येथील प्रकल्प उपअभियंता कार्यालय व विश्रामगृह परिसरातील संरक्षण भिंत मध्यरात्री बुलडोझरच्या साहाय्याने पाडण्यात आल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाविरुद्ध नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
उमरी-नायगाव हा सुमारे २९ किलोमीटर लांबीचा रस्ता प्रकल्प सुरुवातीपासूनच विविध कारणांनी चर्चेत राहिला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या बंदिस्त नाल्यांच्या कामांबाबत ग्रामस्थ, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार निकृष्ट दर्जाच्या कामांची तक्रार केली होती. अनेक ठिकाणी नागरिकांनी आंदोलन छेडत कामेही बंद पाडली होती. त्यानंतर आता शासकीय मालमत्तेचीच तोडफोड झाल्याचा आरोप पुढे आल्याने प्रकल्पावरील प्रश्नचिन्ह आणखी गडद झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव शहरातील मानार प्रकल्प उपअभियंता कार्यालय व विश्रामगृह परिसरातील संरक्षण भिंत रात्रीच्या वेळी बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आली. ही भिंत जलसंपदा विभागाच्या मालकीची असून कोणतीही पूर्वपरवानगी न घेता ती पाडण्यात आल्याने विभागाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे शासनाचे सुमारे ११ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या घटनेनंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रकल्पावर देखरेख ठेवणारे अधिकारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी कमी दिसत असल्याने कंत्राटदार मनमानी पद्धतीने काम करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या संदर्भात नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. दरम्यान, या प्रकरणामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या उमरी-नायगाव रस्ता प्रकल्पावरील संशय अधिकच वाढला असून प्रशासन आता नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
वादग्रस्त प्रकल्पावर नवे प्रश्न
निकृष्ट कामांच्या तक्रारी आधीपासूनच प्रलंबित
ग्रामस्थांनी अनेक ठिकाणी आंदोलने केली
शासकीय संरक्षण भिंत पाडल्याचा आरोप
कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल
शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा
प्रशासनाच्या देखरेखीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह
"रस्ता प्रकल्पातील वाद आता थेट शासकीय मालमत्तेच्या नुकसानीपर्यंत पोहोचल्याने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे," अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
डिझेलच्या कारणावरून सध्या काम बंद,नागरिकांत मात्र उलटसुलट चर्चा
काम सुरू झाल्या पासून वादात अडकलेले काम असून अनेक ठिकाणी काम कमी जास्त करणे नाली काम वाकडे करणे राजकीय दबावात काम कमी जास्त करून मनमानी केल्याचा आरोप होत असताना या कामाची उच्चस्तरीय चौकशी झाल्या नंतर प्रकरण अंगलट आल्याची चर्चा असून सध्या डिझेल चे कारण लावून काम बंद असल्याने या विषयी उलट सुलट चर्चा होत आहे पावसाळा आठ दिवसावर आला असून लवकर काम नाही झाल्यास शाळकरी मुलांना अडचण निर्माण होणार आहे.तर शाळेची व क्लासेस ची वर्दळ शिवाय अनेक गावचा संपर्क आणि शेतकऱ्याची पेरणीची घाई या मध्ये या कामाची घाई आल्यास अडचणी वाढणारं आहेत