नांदेड: हदगाव तालुक्यातील मनाठा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंगळी शिवारात झालेल्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. एका अनोळखी तरुणाच्या रक्ताळलेल्या मृतदेहाची ओळख पटवून मनाठा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत तीन सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
पिंगळी येथील एका शेतात ११ जून रोजी एका तरुणाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील आणि उपविभागीय पोलिस अधिकारी दगडू हाके यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन तपासाला गती दिली. मनाठा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास चवळी व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मृतदेहाची ओळख संतोष अंगद वाघ (वय २३, रा. पोखर्णी, परभणी) अशी पटवली.
तपासादरम्यान मयत संतोष आणि संशयित आरोपींनी एका हॉटेलमध्ये एकत्र मद्यपान व जेवण केल्याची माहिती समोर आली. यादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले.
या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी शंकर कुंडलिक बिरगड (वय २९, रा. कुरुंदा, हिंगोली), विलास लक्ष्मण आवळे (वय २३, रा. टाकळी, यवतमाळ) आणि सूरज संभाजी भजने (वय २१, रा. बरडशेवाळा, नांदेड) या तिघांना वेगवेगळ्या भागांतून अटक केली.
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. किरकोळ वादातून दगडाने ठेचून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
अशी झाली गुन्ह्याची उकल!
सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर, पोलिस उपनिरीक्षक पिराजी गायकवाड, अशोक दाढे, शंकर सोनटक्के, शामराव खनपटे आणि अतुल नागरगोजे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करत हा कौतुकास्पद तपास केला. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला दगड, रक्ताने माखलेली माती, दुचाकी आणि मोबाईल जप्त केला असून पुढील तपास मनाठा पोलिस करत आहेत.