संघपाल वाघमारे
कंधार : हवामान विभागाने राज्यातील विविध भागांत १७ ते २२ मार्च या कालावधीत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान कंधार तालुक्यातील अनेक भागांत गहू, हरभरा, ज्वारी, मका आदी पिकांची काढणी सुरू आहे. अशा परिस्थितीत अचानक पाऊस आल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून २० हजार ४६९ हेक्टरवरील पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे.
कंधार तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ८० हजार हेक्टर एवढे आहे. त्यापैकी ६८ हजार हेक्टर क्षेत्र क्षेत्र शेती लागवडीस योग्य आहे. यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक प्रजन्यमान ११०० मि मी. पेक्षा अधिक पाऊस झाल्याने नदी, नाले, विहिरी, ओहोळ, बोअरवेल आदी पाण्याचे स्रोत भरून वाहत आहेत. त्याशिवाय रब्बी हंगामामध्ये चांगली थंडी पडल्याने गहू व हरभरा आदी पिके जोमात असल्याचे चित्र तालुक्यात बघावयास मिळत आहे.
दरम्यान, खरीप हंगामात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आ-लेला घास निसर्गाने हिरावून घेतला. सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी ही पिके कापणीला आली त्यावेळी अतिवृष्टी होऊन सर्व पिके खरडून उद्ध्वस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला. परिणामी खरिपात शेतकऱ्यांचा झालेला खर्चसुद्धा निघाला नाही.
खरीप हंगामात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा कंबर कसून रब्बी हंगामाकडे आशेने पाहत आहे. आता तरी खरिपात झालेला खर्च निघेल ? या आशेने या पिकाकडे पाहत होता. मात्र अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला जाणार? याची चिंता आता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
यावर्षी रब्बी हंगामात तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हरभरा, गहू, मका, ज्वारी या पिकाची लागवड करण्यात आली होती. हिवाळ्यातील अनुकूल वातावरणामुळे गहू, हरभऱ्याचे पीक चांगले अवस्थेत आले असून अनेक शेतामध्ये पीक पूर्णपणे तयार झाले आहे. मात्र सध्या वातावरणात बदल होत असल्याने आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने, शेतकरी पिकाची काढणी करण्यासाठी दिवस-रात्र शेतात काम करीत आहेत.
गहू काढणीच्यावेळी जर अवकाळी पाऊस झाला तर कापलेला गहू भिजेल. त्यामुळे गव्हाच्या दाण्याची गुण-वत्ता खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाजारात गव्हाला अपेक्षित दर मिळणार नाही. तसेच शेतात उभे पीक पडल्यास उत्पन्नात मोठी घट होऊ शकते.संदीप पाटील मजरे, शेतकरी बारूळ