अरूण तम्मडवार
किनवट : खरीप व रब्बी हंगामातील अविवृष्टी व अवकाळी पावसामुळे फटका बसल्याने किनवट तालुक्यात शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी पिकांकडे मोठ्या प्रमाणात वळण घेतले आहे. उन्हाळी हंगामासाठी सर्वसाधारण 6 हजार 327 हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्षात 10 हजार 176 हेक्टरवर पेरणी झाली असून, हे प्रमाण 160.83 टक्के आहे.
तृणधान्यात ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र 1,924 हेक्टर असताना 3,547 हेक्टरवर(184.36 टक्के) पेरणी झाली आहे. मक्याचे 1 हजार 334 हेक्टर क्षेत्र असून 1 हजार 666 हेक्टरवर (124.89 टक्के) लागवड झाली आहे. भाताचे सर्वसाधारण 123 हेक्टर, उन्हाळी सोयाबीनचे 213 हेक्टर क्षेत्र तर सूर्यफुलाचे 22 हेक्टर असून, यंदा या तिन्ही पिकांकडे शेतकऱ्यांनी पूर्णत: पाठ फिरवलेली आहे. तसेच, यंदा उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी चारा पिकांकडेही दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
गळीतधान्यात तिळाचे सर्वसाधारण क्षेत्र 1 हजार 292 हेक्टर असताना तब्बल 2 हजार 710 हेक्टरवर (209.75 टक्के )पेरणी झाली आहे. भूईमूगाचे 1 हजार 384 हेक्टर क्षेत्र असताना यंदा 1 हजार 101 हेक्टरवरच (79.51 टक्के) पेरा झाला आहे. मूगासाठी केवळ 34 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असताना 367 हेक्टरवर (1,079.41 टक्के) लागवड झाली आहे.
याशिवाय भाजीपाला 552 हेक्टरवर घेण्यात आला असून, ऊस 37, केळी 9, टरबूज 79, मिरची 37, धने 5, कांदा 3 हेक्टरवर पिके घेण्यात आली आहेत. सिंचन सुविधा असलेल्या क्षेत्रातच प्रामुख्याने ही पिके घेतली जात आहेत.
दरम्यान मागील दोन वर्षांपूर्वी उन्हाळी हंगामासाठी 4 हजार 659 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र होते. त्यानंतरच्या दोन वर्षांत त्यात 515 हेक्टरने वाढ झाली असून, यंदा त्यात आणखी 1 हजार 153 हेक्टरची भर पडली आहे.
तीळ हे कमी कालावधीत येणारे व कमी खर्चिक पीक असल्याने शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. बाजारभाव अनुकूल असल्याने ज्वारी, मका व तिळाची लागवड फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.चंद्रकांत निमोड, तालुका कृषी अधिकारी