किनवटमध्ये दीड कोटीच्या शेतकरी भवनास मान्यता pudhari photo
नांदेड

Kinwat Farmers Bhavan : किनवटमध्ये दीड कोटीच्या शेतकरी भवनास मान्यता

आमदार भीमराव केराम यांच्या पाठपुराव्याला यश ः तालुक्यातील शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार

पुढारी वृत्तसेवा

किनवट : किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन शेतकरी भवन उभारण्यास महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून, या निर्णयामुळे किनवट तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांना बाजार समितीच्या ठिकाणीच मुक्कामासह आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किनवट मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. शेतकऱ्यांच्या अडचणी, बाजार समितीतील अपुऱ्या सुविधा आणि दूरवरून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुक्कामाचा प्रश्न त्यांनी मंत्रालय स्तरावर प्रभावीपणे मांडल्यामुळेच या शेतकरी भवनाच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दि. 2 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती, किनवट येथे ‌‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन‌’ या योजनेअंतर्गत नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी एकूण 1 कोटी 52 लाख 71 हजार 247 रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

या शेतकरी भवनामुळे बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सुरक्षित निवास, पाणी, वीज तसेच अन्य मूलभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, खर्च व गैरसोय टळणार असून, बाजार व्यवहार अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

मंजूर अंदाजपत्रकात इमारत बांधकामाचा मुख्य खर्च, रॉयल्टी शुल्क, गुणवत्ता नियंत्रण चाचणी, आकस्मिक खर्च, जीएसटी, कामगार विमा तसेच विद्युत कामांचा समावेश आहे. एकूण खर्चापैकी सुमारे 70 टक्के म्हणजेच अंदाजे 1 कोटी 6 लाख 89 हजार रुपये शासन अनुदान स्वरूपात उपलब्ध होणार असून हे अनुदान दोन टप्प्यांत वितरित करण्यात येणार आहे.

उर्वरित निधी बाजार समितीने स्वनिधी किंवा कर्जाच्या माध्यमातून उभारणे बंधनकारक राहणार आहे. तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल आणि प्रशासकीय मान्यतेच्या दिनांकापासून वर्षभरात शेतकरी भवनाचे बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित आहे. शेतकरी भवनाच्या देखभाल-दुरुस्तीचा तसेच वीज व पाणी खर्च संबंधित बाजार समितीनेच करावयाचा आहे.

किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन गरजांचा विचार करून शेतकरी भवनासाठी जो प्रस्ताव पाठविला होता; त्यास मान्यता दिल्याबद्दल शासनाचे मनःपूर्वक आभार. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर होऊन बाजार व्यवहार अधिक सुलभ होतील.
भीमराव केराम, आमदार, किनवट मतदारसंघ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT