Heavy rains cause damage to vegetable farming, vegetable prices increase
किनवट : पितृपंधरवडा संपला असून, आज रविवारच्या सर्वपित्री दर्श अमावास्येनिमित्त सर्वत्र श्राद्ध विधी पार पडले. या निमित्ताने फळभाज्या आणि पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली महागाई शिगेला पोहोचली होती. प्रचंड पाऊस व अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान आणि त्यात पितृपंधरवड्याची वाढती मागणी यामुळे भाजीपाल्याचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडले आहे.
पितृपंधरवड्यात श्राद्धासाठी विविध फळभाज्या व पालेभाज्यांची मागणी वाढते. पूर्वजांच्या स्मरणार्थ करण्यात येणाऱ्या श्राद्ध पूजनासाठी ब्राह्मण वा जंगमांना शिधा दिला जातो तसेच आप्त, स्वकीयांचे जेवण केले जाते. त्यामुळे या दिवसांत बाजारात भाज्यांचे दर हमखास वाढतात. आज रविवारच्या (दि.२१) आठवडी बाज ारात भेंडी, वांगे, फ्लॉवर, दोडका, टोमॅटो आणि कारल्याचे दर तब्बल १२० रुपये किलोवर पोहोचले.
कोथिंबिरीची जुडी नेहमीप्रमाणे देण्याऐवजी आता २० ते २५ रुपयांना फक्त ५० ग्रॅम एवढीच मिळू लागली. पालक व मेथीचे दर १६० ते २०० रुपये किलोवर गेले, तर आवऱ्याच्या शेंगा १४० रुपये किलोने विकल्या गेल्या. सर्वपित्री दर्श अमावस्येनिमित्त सर्वत्र केल्या जाणाऱ्या श्राद्ध विधीसाठी पंचामृतात लागणाऱ्या भेंडी, कारले, हिरवी मिरची, कढीपत्ता यांच्या भावातही अचानक वाढ झाली.
भोपळा, गिलके, पडवळ, दुधी, गवार, चवळी, काकडी, घोसावळे तसेच पालेभाज्यांमध्ये पालक, मेथी, चुका, अंबाडी, चमकुरा (अळूची पाने) यांना मोठी मागणी होती. शेतातील लागवडीसाठी लसणाची मागणी वाढल्याने त्याचे दरही वाढले. पांढरा कांदा बाजारात उपलब्धच नव्हता, तर लाल कांदा ३० रुपये किलो होता.
किनवट तालुक्यात यंदा ५९९ हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड झाली होती. परंतु वारंवार झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेले मोठे नुकसान आणि त्यात पितृपंधरवड्याची वाढती मागणी यामुळे भाजीपाल्याच्या भावात विक्रमी वाढ झाल्याचे स्थानिक शेतकरी व विक्रेत्यांनी सांगितले.