नांदेड, पुढारी वृत्तसेवा: सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्याने एकाच कुटुंबातील ९ जणांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. या घटनेत एका १२ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत झालेल्या मुलीचे नाव मीरा खानजोडे असल्याची माहिती पोलीस कर्मचाऱ्याने दिली.
नविन नांदेड (सिडको) भागातील गोविंद कॉलनी परिसरात वास्तव्यास असलेल्या मिस्त्री बबन खानजोडे यांनी गुरूवारी कामावरून परत येताना एका शेतातून सोयाबीनच्या शेंगा आणल्या होत्या. त्यांनी आणलेल्या सोयाबीनच्या शेंगा आपल्या कुटुंबातील सदस्यांना दिल्या. यानंतर कुटुंबीयांनी शेंगा उकडून खाल्यानंतर त्यांना मळमळ, उलटी, डोकेदुखी असा त्रास ९ जणांना सुरू झाला. त्या ९ जणांना तातडीने शुक्रवारी रात्री विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
यातील मीरा नामदेव खानजोडे (वय १२) हिचा शनिवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नामदेव खानजोडे, शोभाबाई नामदेव खानजोडे, राणी नामदेव खानजोडे, बबन खानजोडे, अनिल खानजोडे, सुलाबाई खानजोडे, जानू खानजोडे यांना विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर विष्णुपुरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.