Change of power in Zilla Parishad credit union elections
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत मतदारांनी सत्ताधा-यांना झटका देत महारुद्र विकास पॅनेलच्या नऊ संचालकांना विजयी केला. रविवारी रात्री उशीरा झालेल्या मतमोजणीनंतर हे चित्र स्पष्ट झाले.
नांदेड जिल्हा परिषदेची पतसंस्था मोठी आहे. या पतसंस्थेत हजारो कर्मचारी सदस्य आहेत. पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने दोन स्वतंत्र पॅनेल एकमेकासमोर उभे होते. २१ जून रोजी मतदान झाल्यानंतर ७१३ मतदारापैकी ६९१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. रविवारी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी पुर्ण झाल्यानंतर सत्ताधारी बाबूराव पुजरवाड यांच्या मित्रमंडळ पॅनेलचा धुव्वा उडवत महारुद्र विकास पॅनेलने नऊ जागा जिंकून बहुमत प्राप्त केले.
सत्ताधारी प्रस्तावितांना या निवडणुकीत मोठा धक्का बसला. गेल्या महिनाभरापासून जिल्हा परिषदेचे काही कर्मचारी निवडणूक प्रचारात पुर्णवेळ सक्रिय होते. दोन्ही पॅनेलकडून मतदारांना साद घालण्यात आली होती. बाबूराव पुजरवाड यांच्या पॅनेलने समाजमाध्यम तसेच अन्य वेगवेगळ्या मार्गाने मोठा गाजावाजा केला होता. वसंतनगरच्या कृपेने आपले पॅनेल विजयी होईल, असा ही दावा बाबूराव पुजरवाड मित्रमंडळाने केला होता. पण मतदारांनी मात्र महारुद्रच्या पॅनेलला आपला कौल दिला. सत्त ाधारी पॅनेलला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले. तर महारुद्र पॅनेलने नऊ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले.
जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत फेरमोजणीचा प्रसंग ओढवला होता. एका संचालकाच्या निवडणुकीसाठी दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाली. त्यानंतर ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. या ईश्वरचिठ्ठीत महारुद्रच्या संचालकाला नशिबाने साथ दिली.
अतिशय प्रतिष्ठेच्या या निवडणुकीच अशोक कासराळीकर, बालाजी नागमवाड, रवी कांबळे, चेड्डू शिवसांब, प्रेमानंद तलवारे, बालाजी पाटील, रमेश मुपडे, गजानन शिंदे, रवीकांत क्षीरसागर, आनंदा खंदारे, नागेश्वर पांडुरंग जळबा, अरुणा खिल्लारे, सुनीता बनसोडे, अमृत शिंदे व जीवन कांबळे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात केली.
निवडणूक निकालानंतर पुजरवाड गटाने पराभव मान्य न करता आक्षेप घेतला. पण निवडणूक निर्णय अधिका-याने नियमानुसार योग्य तो निर्णय जाहीर करत सत्ताधाऱ्यांना चांगलीच चपराख लगावली. पुजरवाड, देशमुख गटाला आपली सत्ता कायम ठेवायची होती. संजय मिरजकर व हनुमंत वाडेकर यांना पतसंस्थेत परिवर्तन घडवून आणायचे होते. कपबशी व शिलाई मशीन या दोन चिन्हावर झालेली ही निवडणूक चुरशीची ठरली.