Arogya Vardhini Center in Vadgaon remains closed
बाऱ्हाळी, पुढारी वृत्तसेवा: वडगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्र गेल्या काही महिन्यांपासून नियमितपणे बंद राहत असून, नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. आरोग्य हक्काचा बडगा वाजवणाऱ्या शासनाच्या दाव्यांना हरताळ फासला गेला आहे. गावातील लोकांना किरकोळ आजारासाठीसुद्धा दवाखान्यात सेवा मिळत नसल्याने त्रस्त व्हावे लागत आहे. याबाबत आरोग्य विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी घुडुसाब महेबुबसाब यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
केंद्रावर गेले की फक्त कुलूपच दिसते, असे वास्तव आहे. काही वेळा कुलूप उघडे असले तरी तिथे कोणी कर्मचारी नसतो. कधी फक्त परिचारिका असते, प्रभागात कुणालाही ताप, सर्दी, दवाखान्याचे इंजेक्शन, लस किंवा तपासणी करायची झाली तरी त्यांना जवळच्या शहरात जावे लागते, जे अनेक गरीब कुटुंबांसाठी परवडणारे नाही.
या केंद्रावर गर्भवती महिलांसाठी तपासण्या, लसीकरण, रक्तदाब तपासणी, औषधे यासाठी सुविधा उपलब्ध असाव्यात. परंतु प्रत्यक्षात काहीच सेवा मिळत नाही. ज्येष्ठ नागरिकांचीही स्थिती फारच बिकट असून, वारंवार चकरा मारूनही त्यांना उपचार मिळत नाहीत.
स्थानिकांनी आता संयम सोडायला सुरुवात केली आहे. "जर प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही, तर आम्ही आंदोलन करू," असा इशारा घुडुसाब महेबुबसाब यांनी दिला आहे.
ठोस पावले नाहीत ग्रामस्थांनी याबाबत आरोग्य विभागाकडे तक्रारी केल्या असतानाही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. काही ग्रामस्थांनी सांगितले की, "तक्रारी केल्यावर काही दिवस केंद्र उघडते, पण पुन्हा तेच स्थिती होते." यावरून हे स्पष्ट होते की केवळ तात्पुरता उपाय केला जातो. पण कायमस्वरूपी व्यवस्था सुध-ारण्यासाठी कुठलीही ठोस कृती होत नाही.