श्रीक्षेत्र माहूर : शहरातील एका विद्यालयात बारावीचा जीवशास्त्र विषयाचा पेपर सुरू असताना २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १.१७ वा. तहसीलदार अभिजित जगताप यांच्या पथकाने अचानक तपासणी केली असता, एका विद्यार्थिनी जवळ नक्कल आढळून आली. या घटनेमुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तहसीलदार अभिजित जगताप यांनी दोन विद्यार्थिनींचा संशय आल्याने त्यांनी त्यांची तपासणी करण्याचे निर्देश दिले. सुरुवातीला विद्यालयाच्या महिला सेविकेकडून तपासणी करण्यात आली, मात्र त्यावेळी काहीही आढळून आले नाही. त्यानंतर नायब तहसीलदार अरुणा सूर्यवंशी यांनी अधिक तपासणी केली असता एका विद्यार्थिनी जवळ नक्कल साहित्य सापडले. तत्काळ संबंधितांवर नियमानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
दरम्यान, दहावी व बारावीच्या परीक्षा नक्कलमुक्त, भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आटोकाट प्रयत्न करीत आहेत. काही परीक्षा केंद्रांवर ते स्वतः उपस्थित राहून देखरेख करत असल्याचेही दिसून आले आहे. अशा परिस्थितीत माहूर तालुक्यातील आष्टा येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयात दि. १७ फेब्रुवारी रोजी सामूहिक नक्कल प्रकरण उघडकीस आले होते. त्यावेळी उपशिक्षणाधिकारी माधव शिंगडे यांनी विद्यार्थ्यांना सामूहिक नक्कल करताना पकडले होते.
एका बाजूला प्रशासनाकडून कडक देखरेख केली जात असताना दुसऱ्या बाजूला परीक्षा केंद्रांवर कॉपीप्रकरणे उघड होत असल्याने वर्गावरील शिक्षक, बैठे पथक, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी तसेच जिल्हास्तरीय पथकं यांच्या कर्तव्यावर साशंकता निर्माण होणे स्वाभाविकच आहे. विशेष बाब म्हणजे, या विद्यालयाच्या बाथरुममध्ये विद्यार्थ्यांना नक्कल साहित्य सहज कसे उपलब्ध झाले, हा देखील चौकशीचा विषय ठरत आहे.