जालना; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाने ५७ मोर्चे काढले; पण अनुचित प्रकार घडला नाही. मराठा समाज सहन करतो म्हणून तुम्ही परीक्षा बघाल, असा त्याचा अर्थ नाही. अन्य समाजांसारखा मराठा समाजाला न्याय का मिळत नाही, असा सवाल करीत खा. उदयनराजे यांनी जालन्यात लाठीमार करणाऱ्यांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी केली.
अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर शनिवारी उदयनराजे यांनी या गावात येत उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी उदयनराजे म्हणाले, जखमींचा उपचार खर्च शासनाने करावा. आरक्षणासंदर्भात न्यायिक प्रकिया तत्काळ सुरू करावी. शुक्रवारच्या घटनेबाबत दाखल गुन्हे तातडीने मागे घ्यावेत. आंदोलकांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बोललो असून, त्यांची आंदोलनकर्ते व इतरांशी भेट घालून देऊ..