निलंगा : रात्री-अपरात्री जलकुंभावर चढून पाणी टाकी भरली की नाही, हे पाहणे नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत कठीण काम आहे. परिणामी, धोकाही असतो. ही वास्तवता जाणून घेऊन पालिकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी जलकुंभावर आता सेन्सर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. जलकुंभ भरल्यानंतर आपोआप सायरन वाजणार आहे. त्यामुळे पाणीची नासाडी होणार नाही. शिवाय, पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना जलकुंभावर चढावेही लागणार नाही.
शहराला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, म्हणून छत्रपती शिवाजीनगर भागातील जलकुंभ, आयटीआय, नगर परिषद पाठीमागील जलकुंभाजवळील विद्युत व्यवस्था पूर्ववत सुरू करणे, किल्लारी फिल्टर येथील एलईडी दुरुस्त करणे, कॅमेरे बसवणे, माकणी प्रकल्पावरील विद्युत व्यवस्थित दुरुस्त करण्याबाबत विद्युत अभियंत्यांना पालिकेच्या पाणीपुरवठा सभापती सोनाली हाडोळे यांनी सूचना केल्या आहेत.
तसेच शहरातील जलवाहिनी फुटू नये, शहरातील ज्या ठिकाणी पाणी पोहोचत नाही, अशा गल्ली, प्रभागांचा सर्व्हे करून लवकरात लवकर पाणीपुरवठा करण्यासाठीच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. शिवाय, नागरिकांनीही नळाला तोट्या बसून घ्याव्यात आणि पाणी वाया जाऊ देऊ नये, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, जलकुंभभरले की नाही, याची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांना मोबाइलवर नोटिफिकेशनद्वारे मिळू शकणार आहे. दररोज किती पाणी वापरले गेले आणि किती भरले गेले, याची संपूर्ण माहिती असणार आहे. या प्रणालीमुळे जलकुंभ किती टक्के भरले आहे, हे नगर परिषदेच्या मुख्य कार्यालयात बसूनही समजणार आहे असल्याचे नरगराध्यक्ष संजयराज हालगरकर, यांनी सांगितले.