Sanjeevani Bet Latur pudhari photo
लातूर

Sanjeevani Bet Latur : संजीवनी बेटाला संशोधनाची ‘संजीवनी’ कधी ?

वडवळ : उत्तरा नक्षत्र यात्रेला राज्यभरातून गर्दी, वनौषधींचा मोठा ठेवा

पुढारी वृत्तसेवा

संग्राम वाघमारे

चाकूर : उत्तरा नक्षत्र आले की चाकूर तालुक्यातील वडवळ (ना.) येथील संजीवनी बेटावर भाविक, रुग्ण आणि वैद्यांची गर्दी वाढते. महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांतून नागरिक या ठिकाणी येतात. मात्र, वर्षानुवर्षे श्रद्धेचे केंद्र ठरलेल्या या संजीवनी बेटाला शास्त्रीय संशोधनाची ‘संजीवनी’ कधी मिळणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

तालुक्यातील वडवळ (ना.) येथील वटसिद्ध नागनाथ मंदिरामुळे या परिसराला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिर परिसरातील संजीवनी बेट विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. उत्तरा नक्षत्राच्या कालावधीत या बेटावरील वनस्पतींचा पारंपरिक पद्धतीने उपयोग करण्यासाठी दूरवरून नागरिक येतात. यंदाची यात्रा १३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबरदरम्यान सुरू राहणार आहे.

संजीवनी बेटावर काळी टाकळी, शतावरी, गुळवेल, शंखपुष्पी, वासनवेल, गोखरू यांसह विविध वनस्पती आढळतात. या वनस्पतींना पारंपरिक वैद्यकीय पद्धतीत महत्त्व असल्याचे बोलले जाते. उत्तरा नक्षत्रात येथे वनस्पतींचा उपयोग केल्यास आरोग्यास फायदा होतो, अशी अनेकांची श्रद्धा आहे.

मात्र, या वनस्पतींची शास्त्रीय ओळख, औषधी गुणधर्म, जैवविविधता आणि संवर्धन याबाबत व्यापक स्वरूपात अभ्यास होणे आवश्यक आहे. केवळ लोकपरंपरा आणि श्रद्धेपुरता हा ठेवा मर्यादित न राहता त्याचे शास्त्रीय दस्तऐवजीकरण झाले तर संजीवनी बेटाचे खरे महत्त्व अधिक स्पष्ट होऊ शकते. आयुर्वेद संशोधन केंद्राची गरजसंजीवनी बेटावर आढळणाऱ्या वनस्पतींचे शास्त्रीय सर्वेक्षण करून त्यांची नोंदणी करण्यात यावी.

आयुर्वेद तज्ज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ आणि संबंधित संशोधन संस्थांच्या माध्यमातून येथे अभ्यास केंद्र उभारल्यास या भागातील वनौषधी संपदेचा उपयोग व्यापक पातळीवर होऊ शकतो.त्याचबरोबर दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन, बीजसंग्रह, रोपवाटिका आणि वनौषधी उद्यान उभारण्याच्या दृष्टीनेही शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.

उत्तरा नक्षत्राच्या काळात मोठ्या संख्येने भाविक आणि रुग्ण येथे दाखल होतात. त्यामुळे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधा, निवास व्यवस्था, वाहतूक आणि मार्गदर्शन केंद्र यांसारख्या मूलभूत सुविधांची आवश्यकता आहे. प्रशासनाने यात्रेच्या काळापुरत्या सुविधा न देता संजीवनी बेटाच्या दीर्घकालीन विकासाचा आराखडा तयार करण्याची गरज आहे.

पर्यटनासोबत पर्यावरण संवर्धनही आवश्यक

धार्मिक श्रद्धा, वनौषधी आणि निसर्गसंपदा या तिन्हींचा संगम असलेल्या संजीवनी बेटाला आयुर्वेद, पर्यावरण आणि पर्यटनाच्या त्रिसूत्रीवर विकसित करता येऊ शकते. मात्र, विकासाच्या नावाखाली नैसर्गिक अधिवासाला धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.दरवर्षी उत्तरा नक्षत्राच्या काळात हजारो लोकांना आकर्षित करणाऱ्या या बेटाची क्षमता मोठी आहे. त्यामुळे ‘संजीवनी बेट’ केवळ यात्रेचे ठिकाण न राहता वनौषधी संशोधन व संवर्धनाचे केंद्र कधी बनेल, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT