Udgir Life has been in danger due to the continuous rains that have been going on for the past one and a half months.
उदगीर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जीवन संकटात आले आहे. जगाचा पोशिंदा म्हणून गौरवला जाणारा बळीराजा आता अतिवृष्टीच्या छळापुढे हतबल झाला आहे. तिरू नदीकाठच्या गुडसुर, बोरगाव, बेळसांगवी, लाळीहळी, डांगेवाडी, वाढवणा आणि हंडरगुळी या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून वाहून गेल्या. या साऱ्या हानीमुळे शेतकरी मानसिकदृष्ट्या खचला आहे.
शेतकऱ्यांनी बी-बियाणे, औषधे, मजुरांची टंचाई आणि आर्थिक अडचणींना तोंड देत कधी खता बियांसाठी पत्नीचे दागिने गहाण ठेवून पिकाची जोपासना केली होते. कष्टाने जोपासलेली ही पिके आता एकाएकी वाहून गेली आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी जमा केलेले पैसे, लग्नाची तयारी, घर बांधण्याचे स्वप्न या सर्व गोष्टी संकटात आलेल्या शेतकऱ्यांसाठी धक्कादायक ठरल्या आहेत.
अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण द्यायचे होते काहीच्या मुलांची लग्न जमली आहेत ती दिवाळीनंतर करायची होती. कोणाला घर बांधायचे होते तर कोणाला शिकत असल्या मुलांना पैसे पाठवायचे होते शेतातल्या पिकाकडे बघून सावकारनी कर्ज दिले होते आता पिकेच राहिले नाहीत मुलीचे लग्न कशी करावी शिकत असलेल्या लेकरांना पैसे कुठून पाठवावे आणि घर कसे बांधावे हा प्रश्न उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.
अशातच पिकाबरोबर जमिनी खडून गेल्या नदी नाल्याकडच्या शेतकऱ्यांची पिके तर पाण्यासोबत गेलीच पण पाण्याच्या प्रवाहाबरोबर सुपीक जमीन वाहून गेली त्यामुळे आता खडक उघडा पडला आहे अनेक ठिकाणी मोठमोठी खड्डे पडली आहेत जमीन खरडून गेलेल्या रानात आता दुसरे पीक ही येणे कठीण आहे भगदाडे पडलेली जमीन भरून कशी काढावी हा प्रश्न शेतकरी राजाला पडला आहे.
माझ्या शेतातील पिके तर पावसाने पूर्ण गेली. पाण्याच्या प्रवाहात शेतातील माती वाहून गेली जागोजागी खड्डे पडले आहेत त आता शेती कशी करावी आणि कसे जगावे हा प्रश्न पडला आहे.- विश्वनाथ केंद्रे, शेतकरी, गुडसूर,