पूर्वीची शेणामातीने लिपलेली कणगी (दुसऱ्या छायाचित्रात) सध्या वापरात असलेला लोखंडी डब्बा.  pudhari photo
लातूर

Traditional grain storage : पूर्वीच्या शेणामातीच्या ‌‘कणगी‌‘ होताहेत कालबाह्य

धातूच्या कोठ्यांना पसंती; कारागिरांचीही पारंपरिक कणग्या बनवण्याकडे पाठ

पुढारी वृत्तसेवा

विठ्ठल कटके

रेणापूर : पुर्वी ज्वारी, गहु व इतर विविध प्रकारचे धान्य वर्षभर टिकुन राहवे व त्याला उंदीर लागु नयेत किंवा त्यांचा किडीपासून बचाव करता यावा यासाठी नैसर्गिक आणि पर्यावणपूरक पद्धतीचा अवलंब केला जात असे. धान्य साठवितांना धान्यात कडुलिंबाची वाळलेली पाने , लवंग किंवा लसणाच्या पाकळ्या टाकुन ते धान्य लाकडी बांबु , तुराट्या , पळाट्या , सिंदीच्या झाडांचे फोक किंवा मातीपासून तयार केलेल्या “ कणगी “ मध्ये सुरक्षीत ठिकाणी ठेवले जायचे. अशा कणगी आतून बाहेरून शेणा - मातीने लिपलेल्या असायच्या त्यात धान्य सुरक्षित राहत असे.

शिवाय गरीब कुटुंबात धान्य साठविण्यासाठी मातीची मोठी मडकी वापरली जात त्यात धान्य साठवून त्याचे तोंड मातीने झाकून ठेवले जाई. आता हे सर्व कालबाह्य झाले असून त्याची जागा आता लोखंडी डब्बे तसेच आधुनिक पद्धतीच्या मेटल सायलो व बॅग सायलो या आधुनिक साधनांनी घेतली आहे. सध्या बहुतांश करून याच पद्धतीचा अवलंब करताना दिसत आहे.

पुर्वी धान्य उत्पादनासाठी व त्यांची साठवणुक करण्यासाठी नैसर्गिक साधनांचा वापर केला जात होता परंतु आता धान्याचे अधिक उत्पादन घेता यावे व धान्यांचे किटकांपासून संरक्षण करता यावे यासाठी विविध प्रकारची किटकनाशके , बुरशीनाशके व धुरीजन्य रसायनांचा वापर केला जात आहे. त्यामुळे धान्य विषयुक्त होत आहे अशा विषयुक्त धान्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतांना दिसत आहे.या बाबी टाळण्यासाठी व धान्य योग्य प्रकारे ब सुरक्षित रित्या ठेवून ते साठवीण्यासाठी पारंपारिक पद्धतीचाच अवलंब करण्याची गरज आहे.

पुर्वीच्या काळी धान्य पिकविण्यासाठी शेण खत व इतर नैसर्गिकरित्या तयार केलेल्या खतांचा संतुलित वापर केला जात असे. धान्य वर्षभर टिकुन राहवे त्याला किड व बुरशी लागु नये यासाठी धान्य कडक उन्हात वाळवून ते कणगीत साठवितांना धान्यात कड्डलिंबाची पाने , लवंग किँवा लसणाच्या पाकळ्या टाकल्या जात असत असे धान्य साठविण्यासाठी तुराट्या , पळाट्या , शिंदीचे फोक किंवा बांबु पासून तयार केलेल्या व आतून बाहेरून मातीने लिपलेल्या कणगी मध्ये ठेवले जात असे. कणगी स्वच्छ व कोरड्या जागेत ठेवल्या जात , पुर्वीच्या या पद्धतीमुळे धान्य अधिक काळ टिकुन राहत होते. व नैसर्गिक खतांच्या वापरामुळे धान्याला एक वेगळीच चव येत असे अशा प्रकारे पिकविलेल्या धान्याचे उत्पादन कमी मिळत होते परंतु ते आरोग्यवर्धक होते.

आज अधिक उत्पादन मिळावे व ज्वारी , गहू यासह इतर धान्याचे किटकांपासून संरक्षण व्हावे तसेच त्यांच्या साठवणुकिसाठी विविध प्रकारच्या किटकनाशके , बुरशीनाशके , बुरशीजन्य , वनस्पतीजन्य , सुक्ष्मजीवजन्य आंतरप्रवाही , धुरीजन्य , तणनाशके , उंदीरनाशके आदी रसायनांचा वापर केला जात आहे. तसेच अनेक प्रकारच्या रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. त्यामुळे जमिनीची पोत खराब होत चालली असून जमिनीतील पाणीही दूषित होत आहे या सर्व बाबींमुळे आरोग्य धोक्यात आले आहे.

रब्बी हंगाम संपताच नोकरवर्ग व मजुरवर्ग वर्षभराचे धान्य एकाच वेळी खरेदी करून ते घरात सुरक्षित ठेवतात. शेतकरीवर्गही मागे राहत नाही ते पुढील वर्षी पेरण्यासाठी बियाणे व घरच्यासाठी धान्य साठवुन ठेवतात. धान्य साठविण्यासाठी आज कोणाकडेही कणगी नाहीत त्या ऐवजी लोखंडी डब्ब्याचा अधिक वापर केला जात आहे. अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याऐवजी पूर्वीच्या नैसर्गिक आणि पर्यावरणपुरक पद्धतीचाच अवलंब करण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT