Sugarcane crop on seven thousand hectares damaged due to rain, loss of six crores
विठ्ठल कटके
रेणापूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात शुक्रवारी (दि.१९) दुपारी वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस झाला त्यात रेणा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील जवळपास सहा ते सात हजार हेक्टर क्षेत्रातील उभा असलेला ऊस जमिनीवर आडवा पडला असून त्यात किमान सहा कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज रेणा सहकारी साखर कारखान्याच्या शेतकी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. शासनाने पंचनामे करून तातडीने ऊसउत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी रेणा कारखान्याचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील यांनी केली आहे.
रेणा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात रेणापूर तालुक्यातील ८२, लातूरमधील ३६ व औसा तालुक्यातील १३ अशा एकूण १३१ गावांचा समावेश आहे. या गावात १४ हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झालेली आहे. यावर्षी उसाला आवश्यक असणारा पाऊस झाला. त्यामुळे उसाची चांगली वाढ झाली. किमान एकरी शंभर टन उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी गृहीत धरून पुढील वर्षाचे आर्थिक नियोजन केले होते.
परंतु हे नियतीला मान्य नव्हते. शुक्रवारी (दि.१९ सप्टेंबर) दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस झाला. या पावसामुळे काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले. रेणा कारखान्याचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील यांचा वीस एकर ऊस अक्षरशः जमीनदोस्त झाला आहे.
रेणा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील कामखेडा , वाला, मोरवड, पोहरेगाव तत्तापूर, पळशी, इंदरठाणा व रेणापूर तालुक्यातील जवळपास ३० ते ४० टक्के ऊस सध्या जमिनीवर आडवा पडलेला आहे. उसात दोन ते तीन फूट पाणी साचल्यामुळे सर्व ऊस पाण्यात आडवा आहे.
शुक्रवारी दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस झाला. या वादळी पावसामुळे जवळपास चाळीस टक्के ऊस आडवा पडलेला आहे. शासनाने उसाचे पंचनामे करून ऊसउत्पादक शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी.यशवंतराव पाटील, माजी चेअरमन रेणा सहकारी साखर कारखाना रेणापूर.