लातूर : जिल्ह्यात गेल्या महिन्यात आरक्षणाच्या कारणावरून जीवनयात्रा संपविच्या नोंदी संबंधित पोलिस ठाण्यात झाल्या होत्या तथापि यातील तीन प्रकरणांत पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सर्वांगाणे तपास केला असता या जीवनयात्रा संपविण्याच्या घटना आरक्षणासाठी झाल्या नसल्याचा व जीवनयात्रा संपविण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठयाही (सुसाईड नोट) बनावट असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. या प्रकरणी बुधवारी (दि.१४) पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
संशयितांनी अकस्मात मृत्यूंच्या घटनांचा फायदा घेत, पोलीस व शासनाला चुकीची माहिती देऊन शासनावर दबाव आणण्यासाठी बनावट चिठ्ठया तयार करून त्या मृत व्यक्तींनी लिहिल्याचे भासविले होते. शासकीय मोबदला मिळवण्यासाठी हा बनाव रचला असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. या तीन्ही प्रकरणांची अनुक्रमे अहमदपूर, निलंगा आणि चाकूर पोलीस ठाण्यांत नोंद झाली होती. तपासादरम्यान मृतक किंवा जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या नैसर्गिक हस्ताक्षरांची तुलना संबंधित चिठ्यांशी करण्यात आली. प्राथमिक तपासात हस्ताक्षरे जुळत नसल्याचे निदर्शनास आले. पुढील तपासात चाकूर प्रकरणातील हॉस्पिटल सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून चिठ्ठया लिहिणारे संशयित ओळखले गेले. त्यांच्या हस्ताक्षराचे नमुने पंचासमक्ष घेतल्यानंतर चिठ्यांशी साम्य दिसून आले.
ही सर्व कागदपत्रे लातूर पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर येथील दस्तऐवज परीक्षण विभागाकडे पाठविण्यात आली होती. या प्रकरणांचा तपास पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपींनी कबुलीजबाब दिला असून, वैज्ञानिक पुरावे आणि अन्य तपासात्मक माहितीच्या आधारे न्यायालयात संभाजी ऊर्फ धनाजी शिवाजी मुळे (रा. शिंदगी) माधव रामराव पिटले, शिवाजी फत्तु जाधव (हणमंतवाडी), नरेंद्र विठ्ठल जक्कलवाड (रा. शिरनाळ) व तानाजी मधुकर जाधव (रा. हणमंतवाडी) यांच्यावर दोषार-शासकीय दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.