MLA Amit Deshmukh met a farmer from Hadolti
लातूर, पुढारी वृत्तसेवा : बैलजोडी नाही म्हणून स्वतःला औताला जुंपून घेऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक स्थिती जगासमोर आणणारे अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील शेतकरी अंबादास पवार आणि त्यांच्या पत्नीची राज्याचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी रविवारी (६ जुलै) त्यांच्या शेतात जाऊन भेट घेतली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांचा आवाज बनून विधानसभेत काम करू आणि शासनाकडून सर्व प्रश्न सोडवून घेऊ, असे आश्वासन त्यांना दिले.
बहुतांश शेतकरी आता अल्पभूधारक झाल्यामुळे त्यांना बैलजोडी ठेवणे शक्य होत नाही, शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे यांत्रिकीक रणामार्फत शेतीची कामे करणेही अशक्य आहे. डिजिटल साक्षरता नसल्यामुळे शासनाच्या योजनांचे शेतकऱ्यांना फॉर्म भरता येत नाहीत, तर अनेकांनी शेतकरी ओळ खपत्रही अद्याप काढलेले नाही. परिणामी या योजनांचे फायदे सामान्य शेतकऱ्यांना मिळत नाहीत, अशा समस्या त्यांनी निदर्शनास आणल्या.
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला हवे आणि विमा व इतर योजनांचा लाभमिळवण्यासाठी ऑनलाइन सोबत ऑफलाइन फॉर्म भरण्याची व्यवस्था व्हायला हवी, अशा मागण्या पवार यांनी आ. अमित देशमुख यांच्या सोबत झालेल्या चर्चेत केल्या.
शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून अंबादास पवार यांनी ज्या समस्या मांडल्या आहेत आणि ज्या मागण्या केल्या आहेत, त्या विधानसभेत मांडून त्या सोडवून घेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन या भेटीदरम्यान आ देशमुख यांनी पवार व परिसरातील शेतकऱ्यांना दिले. यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, अभय साळुंखे, विजय देशमुख, चंद्रकांत मद्दे, संजय पवार, अनिल चव्हाण, शिवानंद भोसले, शिवानंद हेगणे, आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.