लातूर : पती कामावरून वेळेत परत न आल्यामुळे पोटच्या दीड वर्षांच्या मुलीचा चाकूने सपासप वार करून जन्मदात्या आईनेच क्रूरपणे खून केल्याची घटना सोमवारी पहाटे लातूरमध्ये घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता तिला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले.
लातूर शहराजवळील बारा नंबर पाटी परिसरातील श्यामनगरमध्ये विक्रम चौगुले (वय 34, रा. हासेगाव तालुका कळंब) दोन महिन्यांपासून कामानिमित्त पत्नी अश्विनी (वय 30), चार एक वर्षांचा मुलगा व दीड वर्षांच्या नंदिनी या मुलीसह राहतात. ते ट्रॅक्टर चालक आहेत. रविवारी उसाने भरलेले ट्रॅक्टर रिकामे करण्यासाठी विक्रम चौगुले औसा तालुक्यातील भोसा येथे गेले होते. रात्री परत येण्यास उशीर झाल्यानंतर त्यांची पत्नी अश्विनीने फोन करून आत्ताचे आत्ता घरी या नाहीतर मुलीला मारते अशी धमकी दिली.
पतीने सकाळी घरी येतो म्हणून सांगितले होते. मात्र राग अनावर झाल्याने अश्विनीने दीड वर्षांच्या चिमुरडीवर चाकूने अनेक वार केले. तोंड, पोटात, छातीत आणि गुप्तांगावर चाकूने वार झाल्यामुळे चिमुरडी गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाली. दरम्यान, सोमवारी सकाळी उशिरापर्यंत दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांनी आवाज देऊनही दरवाजा उघडला नाही. शेवटी सकाळी दहाच्या सुमारास पती विक्रम चौगुले आले असता दरवाजा उघडण्यात आला तेव्हा दीड वर्षांची चिमुकली रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
तिला तातडीने उचलून दवाखान्यात नेण्यात आले मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या खून प्रकरणी अश्विनी चौगुले हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.