Mahavitaran's crackdown on electricity thieves; action taken against 50 individuals
आष्टी, पुढारी वृत्तसेवा : परतूर तालुक्यातील रायगव्हाण फीडरवर सिंगल फेजमध्ये प्रचंड ओव्हरलोड (जास्त भार) होत असल्यामुळे महावितरणने आक्रमक पावले उचलत वीज चोरांविरोधात धडक मोहीम उघडली आहे. या कारवाईत सुमारे ५० जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
अधीक्षक अभियंता युवराज जरग आणि कार्यकारी अभियंता विकास आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय अभियंता राधेशाम कुमावत यांच्या विशेष उपस्थितीत आष्टी सेक्शनमधील रायगव्हाण फीडरवर ही कारवाई करण्यात आली. ग्रामीण भागात सिंगल फेज वीज पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड होत असल्याच्या तक्रारी सतत समोर येत होत्या.
या अनधिकृत वीज वापरांमुळे परिसरातील रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) वारंवार जळणे, ट्रिपिंग होणे आणि परिणामी सामान्य वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा न मिळणे अशा समस्या बिकट बनल्या होत्या. या गंभीर प्रकारची महावितरण प्रशासनाने गंभीर दखल घेत रायगव्हाण फीडरवर विशेष पथक तयार करून धडक मोहीम राबविण्याचे नियोजन केले. सून या कारवाईत सहायक अभियंता अनिकेत महाजन, लाईनमन अरविंद खरात आणि लक्ष्मण कडपे यांनी अत्यंत धडाडीने व धाडसाने सहभाग घेत ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली.
आकडेबहाद्दरांचे धाबे दणाणाले
या मोहिमेदरम्यान महावितरणच्या पथकाने रायगव्हाण फीडरच्या विविध भागांत प्रत्यक्ष पाहणी करत विनापरवाना थेट आकडे व हुक टाकून वीज चोरी करणाऱ्यांचे जाळे उद्ध्वस्त केले. तारे वरून अनधिकृतपणे टाकलेले हुक जप्त करण्यात आले आहे. महावितरणच्या या धडक आणि कठोर कारवाईमुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहेत.