निलंगा : महाराष्ट्र शासनाने नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी बंद केल्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल सोयाबीन विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. शासनाने तात्काळ खरेदी केंद्र सुरू करावी अन्यथा चालू बाजार भाव व शासनाचा हमीभाव यातील फरकाची रक्कम तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी या मागणीसाठी शिवसेना, युवासेना व छावा संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन आज बीएसएनएल टॉवर निलंगा येथे सुमारे तीन तास आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने नाफेड अंतर्गत 42000 शेतकऱ्याची नोंदणी केली असून त्यापैकी फक्त पंधरा हजारच शेतकऱ्यांचे खरेदी केली असून उर्वरित 28 हजार शेतकरी विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. या शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करावी अन्यथा बाजार भाव व शासनाचा हमीभाव यातील फरकाची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी या मागणीसाठी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व छावा संघटनेच्या वतीने आत्मदहनाचे निवेदन देऊन बीएसएनएल टॉवर निलंगा येथे तीन तास आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी उपविभागीय अधिकारी यांनी आंदोलनकर्त्याच्या मागणी या शासनाकडे पाठवले असून त्या शासनाकडून मान्य करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर शिवसेना, युवासेना व महिला आघाडी व छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले आहे. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे, तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे, छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष दास साळुंखे, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे, महिला तालुकाप्रमुख रेखाताई पुजारी, शहर प्रमुख दैवता सगर, माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, मेघराज पाटील, सतीश फट्टे, युवती सेनेच्या तालुकाप्रमुख मेहराज शेख इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.