Latur news Pudhari Photo
लातूर

Latur news: महावितरणचा हलगर्जीपणा जीवावर; निलंग्यात तुटलेल्या वीजतारेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

Latur farmer electric shock latest news: गेल्या दोन दिवसांपासून निलंगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडल्याने काही ठिकाणी वीजवाहिन्या देखील तुटून जमिनीवर आल्या होत्या.

पुढारी वृत्तसेवा

निलंगा: महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील हंचनाळ येथे घडली आहे. शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने अशोक भानुदास बिरादार (वय ४८) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (१७ ऑगस्ट २०२५) दुपारी घडली असून, या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे आणि महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

गेल्या दोन दिवसांपासून निलंगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले होते, तर काही ठिकाणी वीजवाहिन्या तुटून जमिनीवर आल्या होत्या. हंचनाळ शिवारातही अशीच एक तार तुटून पडली होती. रविवारी दुपारी अशोक बिरादार हे आपल्या शेतातील कामासाठी गेले होते. मात्र, सायंकाळ झाली तरी ते घरी परतले नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे चिंतेत असलेल्या कुटुंबीयांनी आणि काही ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. तिथे त्यांना अशोक बिरादार जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले आणि त्यांच्या हातात विजेची तार अडकलेली होती. ग्रामस्थांनी तातडीने त्यांना अंबुलगा (बु.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

ग्रामस्थांचा संताप; महावितरणवर गंभीर आरोप

या घटनेनंतर हंचनाळ येथील ग्रामस्थांनी महावितरणच्या निष्काळजीपणावर जोरदार हल्ला चढवला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार वादळामुळे वीजतारा तुटल्याची आणि खांब पडल्याची माहिती महावितरणला देण्यात आली होती. धोकादायक स्थिती असूनही, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या भागातील वीजपुरवठा त्वरित खंडित केला नाही. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यानेच अशा घटना घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. "जर वेळीच वीज बंद केली असती, तर आज आमचा एक माणूस वाचला असता. हा अपघात नाही, हा महावितरणने केलेला खून आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया एका ग्रामस्थाने दिली.

प्रशासकीय दुर्लक्षाचा बळी

अशोक बिरादार यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे. एका क्षणात संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे. ही घटना केवळ नैसर्गिक आपत्तीमुळे घडलेली नसून, प्रशासकीय उदासीनता आणि हलगर्जीपणाचा परिणाम असल्याची भावना परिसरात जोर धरत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे महावितरणच्या पावसाळापूर्व कामांच्या तयारीवर आणि आपत्कालीन व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT