लातूर : जलजीवन मिशन योजनेचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी शासनाला आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने खंडापूर येथील ग्रामस्थांनी आज, ३ ऑगस्ट रोजी लातूर जिल्हा परिषदेसमोर 'भीक मागो' आंदोलन केले. खंडापूर ग्रामपंचायत कार्यालयाचे माजी सरपंच संजय पाटील खंडापूरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून वाजत-गाजत 'भीक मागो' आंदोलन सुरू केले. गावकऱ्यांच्या हातात पाणी आणायचे लांबून, पाईपलाईन निधीवर अवलंबून, सगळीकडे फक्त भ्रष्टाचार, जलजीवन योजनेचा फक्त प्रचार, प्रशासन मजेत, अधिकारी रजेत; योजनेला मिळेना बजेट….असे लक्षवेधी फलक होते.
विशेष म्हणजे आंदोलनात महिलांचाही हभाग होता. या आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी भीक मागून निधी गोळा केला. गोळा झालेली ही सर्व रक्कम शासनाला आर्थिक साहाय्य (फुलाची नाही तर फुलाची पाकळी) म्हणून लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आली. दरम्यान याबाबत ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, खंडापूर येथे जलजीवन योजनेसाठी महाराष्ट्र शासनाची जमीन विनामूल्य घेण्यात आली होती.
या योजनेअंतर्गत विहीर खोदकाम, विहीर आर.सी.सी. बांधकाम आणि स्वीच रूमचे काम २०२३ मध्येच पूर्ण झाले आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्यामुळे पाईपलाईनचे काम अपूर्ण अवस्थेत आहे.प्रशासनाकडून बजेट नसल्याचे सांगण्यात येत असल्याने ग्रामस्थांचा प्रशासनावरील विश्वास उडाला आहे. तसेच कामाला होणाऱ्या विलंबामुळे त्रस्त होऊन काही गुत्तेदारांनी आत्महत्या केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.