Chakur Panchayat Samiti updates
चाकूर : तालुक्यातील कलकोटी, बावलगाव व अजनसोंडा (बु.) या तीन ग्रामपंचायतींमध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगात) झालेल्या कामांमध्ये ५१ लाख ६७ हजार ४६२ रुपयांच्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी मनरेगा विभागातील चार कंत्राटी कर्मचारी व तीन ग्रामरोजगार सेवकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.
कलकोटी येथे गोठा कामात ३२.३३ लाख, बावलगाव येथे शेततळे कामात १५.५२ लाख, तर अजनसोंडा (बु.) येथे गोठा कामात ३.८१ लाख रुपयांच्या अनियमितता आढळून आल्या. याप्रकरणी लातूर व औसा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी सविस्तर चौकशी करून अहवाल सादर केला होता.
चौकशी अहवालाच्या आधारे तांत्रिक सहायक अमोल कुमठेकर, अनिल मिरकले, डेटा एंट्री ऑपरेटर नितीन जाधव व परवेज शेख यांची सेवा संपुष्टात आणण्यात आली आहे. तसेच ग्रामरोजगार सेवक विष्णू गडदे, व्यंकट नेवाळे व भारत कांबळे यांना पदावरून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकरणात यापूर्वी ग्रामसेवक व तांत्रिक सहायकांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, मुख्य जबाबदार अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई न झाल्याने तक्रारदारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणातील अन्य दोषींविरुध्द कार्यवाही करण्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचे गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे यांनी सांगितले.