Ahmedpur Helmet Mandatory Drive
अहमदपूर : लातूर जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटसक्तीची कठोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. १ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी अहमदपूर तालुक्यात विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या ६२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत ६६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यात मागील काही दिवसांत रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांमध्ये २७७ जणांना जीव गमवावा लागला असून, मृतांमध्ये दुचाकीस्वारांची संख्या लक्षणीय आहे. विशेषतः डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अनेक दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
दुचाकी अपघातांमधील जीवितहानी रोखण्यासाठी लातूरचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटचा वापर बंधनकारक केला आहे. त्यानुसार अहमदपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद रायबोले आणि पोलिस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर पोलिसांनी नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर कारवाईची मोहीम राबवली.
या मोहिमेदरम्यान विनाहेल्मेट आढळलेल्या ६२ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यापैकी ३० जणांनी दंडाची रक्कम जागेवरच भरली. उर्वरित ३२ दुचाकीस्वारांवरही नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष केदासे, पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश भोपळे, देवकते यांच्यासह अहमदपूर पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या वाहनधारकांविरोधात कठोर कारवाईची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, दुचाकी चालविताना नियमितपणे हेल्मेटचा वापर करावा आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अहमदपूर पोलिसांनी केले आहे.