लातूर : वडार समाजाच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आ. अभिमन्यू पवारही उपस्थित होते. लातूर येथे आयोजित वडार समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात समाजबांधवांनी मांडलेल्या विविध मागण्या आणि प्रश्नांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडके यांच्या सूचनेनुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत वडार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तांडा वस्तीच्या धर्तीवर ‘वडार वस्ती सुधार योजना’ सुरू करण्याची मागणी यावेळी मांडण्यात आली. तसेच समाजातील नागरिकांना जातीचे व इतर आवश्यक प्रमाणपत्रे सहज आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.
याशिवाय वडार समाजातील नागरिकांची कामगार म्हणून अधिकृत नोंदणी करणे, त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे, तसेच युवक आणि उद्योजकांना उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी विनातारण बीज भांडवली कर्ज उपलब्ध करून देण्याच्या मागण्यांवरही सकारात्मक चर्चा झाली.
मंत्री अतुल सावे यांनी समाजाच्या विविध मागण्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. वडार समाजाच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आ. अभिमन्यू पवार यांनीही वडार समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्याची भूमिका मांडली.
समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शासन सकारात्मक असून आगामी काळातही समाजाच्या विकासासाठी आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संचालक सोनाली मुळे, उपसचिव दिनेश चव्हाण, पशुसंवर्धन विभागाचे सहसचिव नि. भा. मराळे, सहकार विभागाचे उपसचिव विजय भोसले, शिवाजी चव्हाण, कक्ष अधिकारी व्ही. एस. कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव पिराजी मंजुळे, नितीन वाघमारे, भाजपा भटके विमुक्त आघाडीचे सरचिटणीस रवींद्र शिंदे, वडार समाजाचे कार्याध्यक्ष बाळाराम वारकर, रेश्मा जाधव, राजू जाधव, सागर चौघुले, एस. यू. जाधव, प्रभाकर गवारे, कामिनी सकरु, भरत विटकर, दिलीप गुंजाळ, शिवाजी ननवरे आदी मान्यवर उपस्थित होते.