अहमदपूर : आखाड्यावर झोप लेल्या शेतकरी दाम्पत्यांवर १४ सप्टेंबरच्या रात्री अज्ञात व्यक्तीनेहल्ला केला असून यात ६५ वर्षीय वयोवृद्ध शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
या बाबत मिळालेली माहिती अशी, की तालुक्यातील रूध्दा येथील रावसाहेब कडाजी केंद्रे वय-६५ वर्षे व उषाबाई रावसाहेब केंद्रे वय ६० वर्षे हे शेतकरी दाम्पत्य शेतात आखाड्यावर राहतात. नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गालगत (क्रमांक ३६१) गुगदळ शिवारात त्यांची शेती आहे. बर्याच वर्षांपासून ते तिथेच राहतात. गावातील गणपतीची आरती करुन शेतात आल्याची माहीती गावकऱ्यांनी दिली आहे. १४ सप्टेंबरच्या रात्री अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. यात रावसाहेब कडाजी केंद्रे हे जागीच गतप्राण झाले तर उषाबाई रावसाहेब केंद्रे ह्या जबर जखमी होऊन बेशुद्ध झाल्या.
शुध्दीवर आल्यावर राष्ट्रीय महामार्ग गाठून तेथील व्यक्तींना घडलेल्या घटनेची माहिती दिली. लोकांनी त्यांना उपचारासाठी दाखल करून घडलेल्या घटनेची माहिती अहमदपूर पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनुर हे घटनास्थळी दाखल झाले.
या घटनेची माहिती मिळाताच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर, किनगाव पोलीस स्टेशन सहायक पोलीस निरिक्षक भाऊसाहेब खंदारे आदींनी घटनास्थळावर येऊन पाहणी केली. लातूरहून फॉरेन्सिक टिमला व श्वानपथकास पाचारण करण्यात आले आहे.