Earthquake 
लातूर

Earthquake Safety Awareness |भूकंपादरम्यानच्या खबरदारीविषयी जनजागृती करावी

जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड : हिंगोली जिल्ह्यातील भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांचा आढावा

पुढारी वृत्तसेवा

लातूर, पुढारी वृत्तसेवा : भूकंपासारख्या आपत्कालीन परिस्थितीत काय काळजी घ्यावी, काय करावे याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करावी. तसेच सर्व शासकीय विभागांनी सतर्क राहून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज येथे दिल्या.

हिंगोली जिल्ह्यात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित शासकीय यंत्रणांचा आढावा घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक टेकाळे, ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार यावेळी उपस्थित होते. तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीला उपस्थित होते.

हिंगोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे चार धक्के बसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. लातूर जिल्ह्यातही काही भागात हे धक्के जाणवले. अशा परिस्थितीत नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. तसेच या अनुषंगाने कोणत्याही अफवा पसरणार नाहीत, याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी.

भूकंप अथवा इतर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती ऊदवल्यास नागरिकांना तत्काळ योग्य मार्गदर्शन आणि माहिती देण्याची दक्षता घ्यावी. तसेच अशा परिस्थितीत सर्व संबंधित, यंत्रणांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे, असे जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड म्हणाले. लातूर जिल्ह्यातील पाऊस व खरीप पेरण्यांची सद्यस्थिती, पाणी टंचाई उपाययोजना आदी बाबींचाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आढावा घेतला आणि अनुषंगिक सूचना दिल्या. प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी माहिती दिली.

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे

लातूर, पुढारी वृत्तसेवा : भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगावा आणि अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्यासह आपत्कालीन किट तयार ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

संभाव्य प्राधिकरणाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, भूकंपाचा धक्का जाणवल्यास घरात असलेल्या नागरिकांनी मजबूत टेबल, खाट किंवा बीम-स्तंभाखाली आसरा घ्यावा तसेच दरवाजाच्या चौकटीखाली किंवा खोलीच्या कोपऱ्यात उभे राहावे. घराबाहेर असल्यास तत्काळ मोकळ्या जागेत जावे आणि उंच इमारती, झाडे, विजेचे खांब व जुन्या भिंतींपासून दूर राहावे. वाहन चालवत असल्यास सुरक्षित ठिकाणी वाहन थांबवून पूल, उड्डाणपूल किंवा विजेच्या तारांखाली वाहन उभे करू नये.

भूकंपादरम्यान लिफ्टचा वापर टाळावा, काचा आणि जड वस्तूंपासून दूर राहावे तसेच धावपळ किंवा चेंगराचेंगरी होणार नाही याची काळजी घ्यावी. मुख्य धक्क्यानंतर आफ्टरशॉक्स येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या अधिकृत माध्यमांवरून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे. भूकंपानंतर घरातील वीज, पाणी आणि गॅसचे कनेक्शन बंद करावे, जखमींना प्रथमोपचार द्यावेत आणि रुग्णवाहिका तसेच बचाव पथकांच्या वाहनांसाठी रस्ते मोकळे ठेवावेत. तडे गेलेल्या किंवा नुकसान झालेल्या इमारतींमध्ये प्रवेश करू नये, तुटलेल्या विजेच्या तारांना स्पर्श करू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा त्या पसरवू नयेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रत्येक कुटुंबाने पिण्याचे पाणी, कोरडे अन्न, टॉर्च, अतिरिक्त बॅटऱ्या, रेडिओ, प्रथमोपचार पेटी, आवश्यक औषधे आणि महत्त्वाच्या कागदपत्रांच्या छायाप्रती असलेले आपत्कालीन किट तयार ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी १०१ (अग्निशमन), १०० किंवा ११२ (पोलिस) तसेच १०८ (वैद्यकीय आपत्कालीन सेवा) या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT