Announce a special package for farmers along the lines of Karnataka
लातूर, पुढारी वृत्तसेवा : कमी पर्जन्यमानामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्नाटकच्या धर्तीवर राज्य सरकारने सर्वसमावेशक विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
चालू हंगामात पावसाचे प्रमाण कमी असून मान्सून अनियमित राहिल्याने मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाळ्याचे तीन महिने संपत आले तरी लातूरसह अनेक भागांत समाधानकारक पाऊस झालेला नाही.
त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. पेरण्यांमधील विलंब, जमिनीतील आर्द्रतेचा अभाव, भूजल पातळीत झालेली घट आणि अपुऱ्या सिंचन सुविधांमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्याला तातडीने मदतीची गरज आहे.
मराठवाडा व विदर्भातील तीव्र प्रभावित भागांसाठी विशेष पॅकेज मंजूर करावे, जिल्हानिहाय व तालुकानिहाय परिस्थितीचे मूल्यांकन करून दुष्काळ जाहीर करावा आणि पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. पीक नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, बाधित शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून व्याजात सवलत द्यावी तसेच कर्जवसुलीला स्थगिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी विशेष सानुग्रह अनुदान योजना, दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्या किंवा चारा बँका सुरू कराव्यात. तसेच हवामान बदलाचा सामना करण्यासाठी कायमस्वरूपी धोरण आखावे, अशी मागणी धिरज देशमुख यांनी केली आहे.