Adequate stock of fertilizers and seeds in Latur district
लातूर, पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खत व बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झाली असताना लातूर जिल्ह्यात खत व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही धावपळ किंवा घाईगडबड करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, जमिनीत ८० ते १०० मि.मी. पाऊस पडून पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. तसेच खत खरेदी करताना एखाद्या विशिष्ट खताच्या ग्रेडचाच आग्रह धरण्याची आवश्यकता नसून उपलब्ध पर्यायी खतांचाही वापर करता येऊ शकतो. कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी खत व बियाण्यांची विक्री कमाल किरकोळ किंमतीपेक्षा (एमआरपी) जास्त दराने करू नये.
तसेच खत किंवा बियाण्यांसोबत इतर नको असलेल्या वस्तूंची सक्तीने विक्री (लिंकिंग) करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. खताचा साठा उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना पुरवठा करण्यास टाळाटाळ करणे, कृत्रिम टंचाई निर्माण करणे किंवा बेकायदेशीर साठेबाजी करणे आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. मे २०२६ अखेर जिल्ह्यासाठी २७ हजार ५७४ मे.टन खतांचे आवंटन मंजूर असताना २९ हजार ४१९ मे. टन खतांचा पुरवठा झाला आहे. मार्चअखेरचा शिल्लक साठा धरून सध्या जिल्ह्यात एकूण ६५ हजार ३७५ मे. टन खत उपलब्ध आहे.
यामध्ये युरिया, डीएपी, संयुक्त खते, एसएसपी आणि एमओपी या सर्व खतांचा पुरेसा खत व बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत भरारी पथक कार्यरत असून तालुकास्तरावर गुण नियंत्रण निरीक्षकांकडून नियमित तपासण्या सुरू आहेत. शेतकऱ्यांनी कोणतीही अडवणूक, जादा दर आकारणी किंवा फसवणूक होत असल्यास तत्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.