A farmer's unique experiment to attract honeybees
विठ्ठल कटके
रेणापूर : मधमाशी पालन हा एक अत्यंत फायदेशीर व शेतीपूरक व्यवसाय आहे. या व्यवसायातून शुद्ध मध तर मिळतोच परंतु त्यातून मेण आणि फळबागेतील फळांचे परागकण होऊन २५ ते ३० टक्के उत्पादन वाढण्यास मदत होते. परंतु हवामानातील बदल कीटकनाशकांचा अति वापर, हिरवी राने, हिरवे बांध, पाण्याचा अभाव, फुलशेती यासह इतर अनेक कारणांमुळे मधमाश्यांची संख्या अत्यंत कमी झाली आहे.
असे असतांनाहि वातावरणातील मधमाशा आपल्या फळबागेत याव्यात म्हणून रेणापूरच्या पद्माकर लोखंडे व प्रवीण लोखंडे या बंधुंनी फळबागेतील आंब्याच्या प्रत्येक झाडाच्या फांद्याना व मातीच्या मडक्याना मेण लावून मधमाशांना आकर्षित करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांना या प्रयोगामुळे शुद्ध मध तर मिळतोच आहे. शिवाय त्यांच्या फळबागेतील फळझाडांचे परागीकरण होऊन फळउत्पादनाचा फायदा झालेला आहे. त्यांच्या या यशस्वी प्रयोगाची रेणापूर तालुक्यात विशेष चर्चा होत आहे.
वातावरणातील बदलामुळे मधमांशाची संख्या खूपच कमी झाली आहे त्यामुळे मध उत्पादनासोबतच शेतीचे उत्पादनही घटत आहे. धान्य उत्पादनात मधमाश्यांचे मोठे योगदान असते. मधमाशाची संख्या कमी झाल्याने यावर मोठा परिणाम झालेला आहे. पंधरा वर्षांपूर्वी रेणापूरच्या प्रवीण लोखंडे व पद्माकर लोखंडे यांनी लाकडी मधुपेट्याव्दारे मधमाश्यांपालन करून मध उत्पादनाचा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी बाहेरून दहा मधुपेट्या व चार ते पांच लाख मधमाश्या विकत आणून मध संकलनाचा व्यवसाय केला होता. या व्यवसायातून त्यांना महिन्याकाठी २५ ते ३० किलो मध मिळत होता. मधमाश्यांसाठी आवश्यक असणारी हिरवी राने, फुलांची झाडे, मुबलक पाणी, मोठे बांध, फळबागा, सूर्यफुलांची लागवड व बागायती शेती आदी गोष्टी उपलब्ध होत्या.
त्यामुळे मधमाशांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. कालांतराने पावसाचे प्रमाण कमी झाले नदी-नाले कोरडे पडले, फुलशेती व सूर्यफुलाचा पेरा कमी होऊन तो कालबाह्य झाला, रासायनिक खते व कीटकनाशक औषधीच्या फवारण्या वाढल्या त्यामुळे मधमाश्यांना एक प्रकारचा लकव्यासारखा रोग होऊन त्यांची संख्या रोडावली व ती कमी झाली. वातावरणातील या बदलामुळे लोखंडे बंधुनी मधसंकलनाचा व्यवसाय बंद केला होता.
लोखंडे बंधुनी आपल्या शेतात विविध प्रकरच्या आंब्याची व इतर सातशे ते आठशे फळझाडांची झाडे लावली आहेत. या झाडांना अधिक फळधारणा व्हावी व मधाचेही उत्पादन मिळावे यासाठी त्यांनी वातावरणातील मधमाशाना फळबागेत आकर्षित करण्यासाठी त्यांनी आंब्याच्या फांद्याना व बागेत ठेवलेल्या मातीच्या मडक्यांना मेण लावला मेणामुळे वातावरणातील मधमाशा आकर्षित होऊन त्यांनी फळबागेतील बहुतांश झाडावर व मातीच्या मडक्यात मधाचे पोळे तयार केले आहेत- त्यातून लोखंडे बंधुंना मधाचे उत्पादन तर मिळालेच परंतु या वर्षी आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणात फळधारणाहि झालेली आहे असे सांगून हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागते असे लोखंडे बंधुंनी सांगीतले.