भोकरदन : भोकरदन तालुक्यातील नांजा गावात बकरीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नांजा गावातील दत्ता ज्ञानेश्वर सोरमारे (वय 24) हा तरुण रविवारी सकाळी शेतात बकऱ्या चारण्यासाठी गेला होता. यावेळी बकऱ्या नाल्याच्या बाजूला चरत असताना एक बकरी पाला खाताना थेट नाल्यात पडली. नाल्यात पाणी वाहत असल्याने बकरी पाण्याच्या प्रवाहात वाहू लागली आणि मोठ्या आवाजात ओरडू लागली. हे पाहून दत्ता बकरीकडे धावला.
दत्ताला वाटले की पाणी कमी आहे, त्यामुळे तो बकरीला वाचवण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र प्रवाहाचा जोर जास्त असल्याने तोही बकरीसोबत वाहून गेला. बकरी नाल्याच्या दरडीवर आपटली तर दत्ता पाण्याच्या खोलीत बुडून गेला. हा नाला नांजा-भोकरदन रस्त्यालगत असून कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ ही दुर्घटना घडली.
बराच वेळ घरी परत न आल्याने दत्ताचे वडील ज्ञानेश्वर सोरमारे यांनी शेतात जाऊन शोध घेतला. यावेळी कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ त्यांना मुलाच्या चपला पाण्यावर तरंगताना दिसल्या. तत्काळ गावकऱ्यांना बोलावून शोध घेण्यात आला. मात्र दत्ता गाळात अडकून गेल्याने बाहेर काढणे कठीण झाले.
गावकऱ्यांनी कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे उघडले. त्यानंतर भोकरदन येथील अग्निशामक दलाच्या कादरी यांच्या पथकाने पाण्यात उतरून शोधमोहीम राबवली आणि दत्ताला बाहेर काढण्यात यश आले. मात्र त्याला तातडीने भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दत्ता याचा केवळ सहा महिन्यांपूर्वी शिरजगाव घाटी येथील तरुणीशी विवाह झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण नांजा गावात शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी मोठी हळहळ व्यक्त केली आहे.