Jalna Water Crisis pudhari photo
जालना

Water crisis : जालना जिल्ह्यावर घोंगावते पाणी संकट

लघु व मध्यम प्रकल्पांतील घटता जलसाठा चिंताजनक

पुढारी वृत्तसेवा

Water crisis looms over Jalna district

जालना, पुढारी वृत्तसेवा जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी जालना जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणीटंचाईची भीती पुन्हा डोके वर काढू लागली आहे. जिल्ह्यातील ७ मध्यम व ६० लघु सिंचन प्रकल्पांमधील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक असून, येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस न झाल्यास जिल्ह्यावर गंभीर पाणी संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांपैकी कल्याण मध्यम प्रकल्प पूर्णपणे कोरडा असून त्यामध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. इतर सहा मध्यम प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या पावसामुळे, काही प्रमाणात समाधानकारक पाणीसाठा, शिल्लक आहे. मात्र, लघु प्रकल्पांची स्थिती अत्यंत गंभीर आहे. जिल्ह्यातील, ६० लघु तलावांपैकी दोन तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत, तर तब्बल ४१ तलावांमधील पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे.

या सर्व लघु प्रकल्पांमध्ये मिळून केवळ ४.२६ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याने प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढली आहे. यंदा जून ते १४ जुलै या कालावधीत जिल्ह्यात २१४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ ३५ टक्के आहे. जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली.

सध्या सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, मका आदी पिकांची उगवण चांगली झाली असली तरी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होऊ लागला आहे. त्यातच कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी पिके कोमेजताना दिसत असून, शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.

मोठा पाऊस न झाल्याने तलावांसह विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीतही अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कृषी आणि जलसंपदा विभागाचे लक्षही आता आगामी पावसाकडे लागले आहे. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाल्यास जलसाठ्यात वाढ होऊन शेती आणि पिण्याच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात कमी होऊ शकते. मात्र, पावसाने आणखी दडी मारल्यास जिल्ह्यातील जलसंकट अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्ह्यातील ७ पैकी ४ मध्यम तलावात २५ टक्के तर ३ तलावात ५० टक्के पाणीसाठा आहे. ६० लघु तलावांपैकी १५ तलावांत २५ टक्के, २ तलावांत ५० टक्के तर ४१ तलाव हे जोत्याखाली आहेत. २ तलाव कोरडे पडले आहे. मोठे पाऊस पडले नसल्यामुळे जिल्ह्यातील लघु व मध्यम तलावात समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT