वडीगोद्री: धुळे-सोलापूर महामार्गावरील वडीगोद्री उड्डाणपुलावर शुक्रवारी दुपारी धावत्या कारने अचानक पेट घेतला. यावेळी कारमधील चार जणांनी कारमधून उडी घेउन जीव वाचविला. कारमधून चार जण वेळीच बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. मात्र या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
बीड येथील एक कुटुंब मित्राची कार (क्र. डी डी -11--6081) घेऊन नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. दुपारी 1 वाजेच्या सुमारास त्यांची कार वडीगोद्री उड्डाणपुलावर आली असताना अचानक कारच्या एसीमधून धूर निघू लागला. धूर दिसताच प्रवाशांनी क्षणाचाही विलंब न लावता कार थांबवून कारमधून बाहेर उड्या घेतल्या.
ते बाहेर येताच कारने भीषण पेट घेतला. वडीगोद्री परिसरात अग्निशमन दलाची सुविधा नसल्याने आग विझवण्यासाठी ग्रामस्थांना मर्यादा आल्या. कार पूर्णपणे जळेपर्यंत आग आटोक्यात येऊ शकली नाही. यावेळी आगीची घटना पहाण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे या महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.