रावसाहेब अंभोरे
टेंभुर्णी : नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी आणि गुढीपाडव्याचा उत्साह असतानाच, गुरुवारी (दि.२०) मध्यरात्री निसर्गाने घातलेल्या घालामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी परिसरात झालेल्या भीषण आवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेली गव्हाची आणि ज्वारीची पिके पूर्णपणे आडवी झाली आहेत.
महसूल विभागाच्या कृषी मंडळ टेंभुर्णी अंतर्गत येणाऱ्या गट क्रमांक ३४७ आणि परिसरातील शेतजमिनीत रब्बी हंगामातील पिकांची मोठी नासाडी झाली आहे. आधीच खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान सोसावे लागलेल्या शेतकऱ्यांनी रब्बीकडून मोठी अपेक्षा ठेवली होती. मात्र, या अवकाळी संकटामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
नुकसानग्रस्त भागाची महसूल विभागाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने धोंडीराम पवार, समाधान कुमकर, सुनिता अंभोरे, प्रभूराम पवार, विनायक डव्हळे, रावसाहेब अंभोरे, परमेश्वर गायकवाड, संदिप खरात, भगवान पवार, गजानन कुमकर, भाऊसाहेब अंभोरे, बबनराव अंभोरे, योगेश ढवळे, कैलास पवार, विष्णू डव्हळे आदी शेतकऱ्यांचा समावेश आहे. जाफ्राबादचे तहसीलदार आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली आहे.
"खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची कसर रब्बीमध्ये भरून निघेल अशी आशा होती. पण हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. उभं पीक जमीनदोस्त झाल्याने आता जगायचं कसं? शासनाने तातडीने मदत द्यावी हीच विनंती."— समाधान कुमकर (शेतकरी, टेंभुर्णी)