Chaos and mismanagement in the Pradhan Mantri Gharkul Yojana.
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वालसावंगी- सुंदरवाडी गावात व ग्रामीण भागातील गरिबांना हक्काचे घर मिळवून देणाऱ्या 'प्रधानमंत्री आवास योजनेचा' घरकुल योजनेत मोठा सावळा गोंधळ उडाला असल्याचे समोर आले आहे.
तालुक्यातील वालसावंगीसह मोठमोठ्या गावात अनेक गावांमध्ये गावांमध्ये घरकुल वाटपात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून, एकाच घरात ३ ते ४ लाभार्थ्यांना घरकुलाच्या यादीत नावे आल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी आक्रमक मागणी आता ग्रामस्थांमधून केली जात आहे.
शासनाने बेघर आणि गरजू कुटुंबांना पक्के छप्पर मिळावे म्हणून प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. मात्र, भोकरदन तालुक्यातील वालसावंगी सह अनेक गावांमध्ये आणि दलालाच्या संगनमताने या योजनेचा पुरता बुरखा फाडला आहे. गावातील अत्यंत गरजू, भूमिहीन आणि खऱ्या लाभार्थ्यांना वर्षांनुवर्षे प्रतीक्षा यादीत ठेवले गेले आहे.
दुसरीकडे, आर्थिक देवाणघेवाण करून एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांची नावे घरकुल यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. एकाच घरात राहणाऱ्या तीन ते चार जणांना घरकुलाचा निधी वर्ग करण्यात आल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय, निकष धाब्यावर नियम डावलून अपात्र आणि सधन लोकांना या योजनेचा लाभ मिळवून दिला गेल्याचा आरोप होत आहे. कागदोपत्री फेरफार करून निकष पूर्णपणे धाब्यावर बसवले गेले आहेत.
प्रधानमंत्री घरकुल योजनेची नवीन यादी अद्याप लावलेली नाही या यादीमधील पती किंवा पत्नीने दोघांपैकी एकाने या अगोदर लाभ घेतला असेल तर पुन्हा लाभ दिला जाणार नाही. यामध्ये कोणी दलाल व एजंट असल्यास त्याच्या आमिषाला बळी पडू नका जो खरा लाभार्थी आहे. त्याला घरकुल दिले जाईल. जर कोणी यामध्ये ग्रामपंचायतचे बनावट कागदपत्रे तयार सही शिक्के मारून लाभघेण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल.सुनील पडोळ, ग्रामविकास अधिकारी
चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा या गंभीर गैरप्रकाराची तत्काळ दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भोकरदन तालुक्यातील वालसावंगी संबंधित गावातील घरकुल यादीची सखोल चौकशी करावी. एका घरात दोन तीन लाभार्थी घरकुलाचा लाभ घेत असतील तर अशा बोगस लाभार्थ्यांचे घरकुल रद्द करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. जे खरे लाभार्थी असतील त्यांना शासनाचा लाभमिळणे गरजेचे आहे. आणि जर यामध्ये कोणी दलाल व एजंट घरकुल योजनेमध्ये पैसे घेऊन फसवणूक करत असेल तर त्याच्या तोंडाला शिवसेना स्टाईलने काळे फसले जाईल.नानासाहेब वानखेडे, शिवसेना तालुकाप्रमुख