The drama of the kidnapping of a thirteen-year-old boy
हारुन कच्छी
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील बसस्थानक परिसरातून तेरा वर्षीय बालकाचे अज्ञात व्यक्त्तीने अपहरण केल्याचे सांगीतल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर खरा प्रकार समोर आला.
आष्टी येथे शुक्रवारी आठवडी बाजार व गणपती तसेच महालक्ष्मीच्या सणामुळे बाजारात गर्दी होती. तेरा वर्षीय इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या मुलाने १८ सप्टेंबर रोजी दुपारी तो बसस्थानक परिसरात लघुशंकेसाठी गेला असता एका अनोळखी इसमाने जेवणाचे हॉटेल कुठे आहे, असे विचारले. यावेळी मुलाने सदर व्यक्तीस मोंढा भागात चांगले जेवण मिळते, असे सांगितले. त्यानंतर संबंधित इसमाने हॉटेलचा पत्ता दाखविण्याची विनंती करून मुलाला मोटारसायकलवर बसविल्याचे मुलाने घरच्यांना सांगीतले होते.
मुलाच्या म्हणण्यानुसार, संबंधित इसमाने त्याला मोंढा परिसराकडे नेल्यानंतर त्याच्या तोंडावर रुमाल लावला. त्यानंतर तो हा बेशुद्ध झाला. अज्ञात व्यक्तीने त्याचे हातपाय बांधून त्याला मोटारसायकलवरून घनसावंगीच्या दिशेने नेल्याचे आदीनाथने सांगीतले होते.
घनसावंगी शहराजवळ अपहरण करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने मोटारसायकल थांबवून तो लघुशंकेसाठी थांबला असता त्याला शुद्ध आली. त्याने प्रसंगावधान राखत हातपायास बांधलेली दोरी सोडवत घनसावंगी शहराच्या दिशेने धावत सुटल्यााचे सांगीतले. यावेळी नागरिकांच्या मदतीने त्याने मोबाईलवरून कुटुंबीयांशी संपर्क साधून घडलेली घटना सांगीतल्याची माहीती दिली होती. घटनेची माहिती मिळताच मुलाचे वडील रामलिंग सोमवंशी व नातेवाईक तातडीने घनसावंगी येथे पोहोचले. त्यांनी मुलाला ताब्यात घेतले.
त्यानंतर काही नागरिकांसह ते घनसावंगी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. मात्र, घटना आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास त्यांना सांगण्यात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले होते. दरम्यान, शनिवार (१९) रोजी अपहरणाचा प्रयत्न झालेला मुलगा, त्याचे वडील तसेच काही नागरिक व व्यापारी आष्टी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.
त्यांनी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक के. जी. पवार यांच्याकडे घटनेबाबत अर्ज देऊन संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याचे वडील हे आष्टी येथे पानटपरीचा छोटा व्यवसाय करतात. आदिनाथ हा इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे. भरदिवसा बसस्थानक परिसरातून शाळकरी मुलाच्या अपहरणाच्या प्रयत्नामुळे आष्टी गावात खळबळ उडाली होती.
या घटनेचा तपास करत असतांना पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सदर मुलाची सखोल चौकशी केली असता चौकशीत वडील रागवल्याने तो निघुन गेला होता. त्यानंतर त्याने अपहरण झाल्याची खोटी बतावणी केल्याचे समोर आले.
गस्त वाढविण्याची मागणी
बसस्थानक, बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी या घटनेनंतर नागरिकांतून केली होती. दरम्यान, या घटनेची पोलिसांकडून चौकशी केल्यानंतर खरा प्रकार समोर आला. मुलाने अपहरणाच्या रचलेल्या खोट्या कहानीने पोलिसही चक्रावून गेल्याचे दिसून आले.