जालना ः शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि वाढत्या महागाईच्या विरोधात सोमवार, दि. 18 रोजी जालना शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने मोती बाग परिसरात गळ्यात कांद्याच्या माळा परिधान करून राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे बीडकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते. ‘शेतकऱ्यांना न्याय द्या’, ‘महागाई कमी करा’, ‘कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
वाढत्या खतांच्या किमती, शेतीमालाला मिळणारा कवडीमोल भाव, वीज बिलांचा गंभीर प्रश्न आणि सर्वसामान्यांना भेडसावणारी प्रचंड महागाई यामुळे शेतकरी आणि नागरिक पूर्णपणे त्रस्त झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
मोतीबाग परिसरात ऐन गर्दीच्या वेळी हे आंदोलन झाल्याने काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. बीडकडे जाणाऱ्या गाड्यांची लांब रांग लागली होती. यावेळी पोलिसांनी वाहतुक सुरळीत केली.