Shiv Sena protests over farmers' issues Jalna
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना जिल्ह्यात झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून अतिवृष्टीग्रस्ताना भरीव मदत देण्याची मागणी जालना जिल्हा शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेऊन केली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेच्यावतीने तीव्र निदर्शने करीत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रचंड घोषणाबाजी करून कार्यालय दणाणून सोडण्यात आले. या शिष्टमंडळात जिल्हासंघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवानरावकदम, मुरलीधर शेजूळ, माजी सभापती मुरलीधर थेटे, तालुकाप्रमुख हरिहरशिंदे, जयप्रकाश चव्हाण, माजी जिप सदस्य बबनराव खरात, शहरप्रमुख बालापरदेशी, घनशाम खाकीवाले, दुर्गेश काठोटीवाले, प्रभाकर उगले, बाबुराव कायंदे आदींचा समावेश होता. यावेळी निवेदन करतांना जिल्हाप्रमुख अंबेकर म्हणाले की, मागील काही दिवसात जालना जिल्ह्यातील सर्वच मंडळात प्रचंड मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली.
या अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यातीलशेतकऱ्यांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. शेतकऱ्यांची सोयाबीन, कपाशी, तूर, फळबाग आदी पिके पूर्णतः हातची गेली. अगोदरच पेरणी-मशागतीसाठीशेतकऱ्यांनी सरकारी, खाजगी बँका व इतर मागनि कर्ज काढून केलेला खर्च पूर्णतः वाया गेला आहे. अशा अडचणीतील शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी सरकारने अत्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे होते.
परंतु विरोधी पक्षाच्या व संघटनांच्या दबावामुळे सरकारने मंगळवारी नुकतीच मदतीची घोषणा केली. सरकारने घोषित केलेली मदत ही अतिशय तुटपुंज्या स्वरुपाची आहे. मराठवाड्यात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भरीव मदत मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले.
जिल्ह्यासह राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना सरसगट कर्जमुक्त करण्यात यावे, सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांना मिळणारी मदत सरसकट असावी जेवढे खातेदार असतील त्या सर्वांना मदत मिळावी कोणीही वंचित राहू नये, अतिवृष्टी व पुराने वाहून गेलेल्या पोस्टमार्टम अटीशिवाय मदत द्यावी, नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्याने जाहीर झालेली प्रती हेक्टरी १७ हजार व २७ हजार ही मदत वाढवून प्रती हेक्टरी ५० हजार रुपये करण्यात यावी, शहरी भागातही अनेक वस्त्यांत पाणी घुसले तेथील घरांची पडझड झाली त्यांनाही मदत देण्यात यावी, मदतीत फळबागांचा उल्लेख नाही त्यांनाप्रती हेक्टरी १ लाख रुपये या प्रमाणे मदत करण्यात यावी.