परतूर : माजलगाव येथून नागपूर येथे रेशनचा तीस टन तांदूळ काळया बाजारात जात असताना पोलिसांनी नाकाबंदी करून तांदुळसह ट्रक पकडुन जप्त केला. याप्रकरणी परतूर पोलिसात चौघा जणांविरुद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक एम.टी. सुरवसे यांना दि. २ फेब्रुवारी २५ रोजी सकाळी गोपनीय माहिती मिळाली की, माजलगाव येथून नागपूर येथे राशनचा तांदूळ काळा बाजारात जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून वाटूर फाटा येथे नाकाबंदी करून ट्रक क्रमांक एमएच २३ एयु ९३९३ पकडून पाहणी केली असता त्यामध्ये तांदूळ मिळून आल्याने परतूर पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार दादमिया शेख यांना समक्ष घटनास्थळी पाहणी करून अहवाल सादर केला आहे. या ट्रकमध्ये तीस टन रेशनचे तांदूळ किंमत दहा लाख पन्नास हजार रुपये आणि तीस लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण- चाळीस लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला.
ट्रॅक चालक राजेंद्र बळीराम पोटेकर रा.सिपगाव ता.गेवराई आणि क्लिनर अमोल रावसाहेब उबाळे रा.वरखेड ता.शेवगाव तसेच ट्रक मालक आणि रेशन तांदूळचे मालक अशा चार जणांविरुद्ध परतूर पोलिसात गुन्हा नोंद करून कारवाई केली आहे. हा मुद्देमाल परतूर येथील शासकीय गोडाऊन मध्ये जमा केला आहे.
ही कारवाई पोलिस अधिक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी दादहरी चौरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक एम.टी.सुरवसे, नायब तहसीलदार दादामिया शेख, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे, उपनिरिक्षक राऊत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदू खंदारे, पोहे किरण चव्हाण, पोका नरेंद्र चव्हाण, भगवान खालापूरे, चालक धोत्रे यांनी केली आहे.