विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड उड्डाण पुलाला संरक्षण कठडे नसल्याने कॉईल घेऊन जाणारा ट्रेलर पलटी झाला. तर घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही मात्र मोठा अनर्थ टळला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रविवारी (दि.९ऑगस्ट) पहाटे ५.०० वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरून नागोठणे बाजूकडून माणगाव बाजूकडे कॉईल भरून जाणारा ट्रेलर क्र.एम.एच.४३ सि.के.९०१३हा ट्रेलर कोलाड येथील उड्डाण पुलावरून जात होता. उड्डाण पुलाला संरक्षण कठडे नसल्याने पुलाचा अंदाज न आल्यामुळे ट्रेलर पलटी झाला. तसेच ट्रेलरचा जॉईंट तुटल्यामुळे ट्रेलरची कॅबिनवर व ट्रेलर बायपास रस्त्यावर पलटी झाला असून, सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. अधिक तपास कोलाड ठाण्याचे सपोनि भारत फार्णे यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलीस करीत आहेत.
मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम हे गेली 16-17 वर्ष सुरू आहे. मात्र ते आजतागायत पूर्णत्वावर नसल्याने दररोज अपघातांची मालिका सुरूच आहे. तर काही ठिकाणी उड्डाण पुलांचे अर्धवट काम तर काही ठिकाणे भयानक पडलेले खड्डे हे अपघातात कारणीभूत ठरत आहेत. रस्ते पूर्ण नसताना टोल वसुलीवर भर तर रायगड जिल्हा हद्दीतून जाणारा मुख्य मुंबई गोवा महामार्गाची दुर्दशा झाल्यानी बोंब सुरू आहे. जिल्ह्यातील आमदार, खासदार, मंत्री यांनी मंत्रालयात अधिकारी वर्गासमवेत आढावा बैठकीवर बैठका सुरू केल्या आहेत. मात्र खड्डे आणि महामार्गाची दुरुती याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु या पुलाचे काम अर्धवट स्थितीत असून या पुलाला संरक्षण कठडे ही अर्धवट स्थितीत आहेत. या उड्डाण पुलावरून दोन्ही बाजूनी वाहतूक सुरु करून प्रवाशी वर्गाच्या जीवाचा खेळ मांडला आहे; असेच एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येत आहे.