'Orange Alert' Today; Possibility of Hailstorms Accompanied by Gusty Winds
जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील हवामानात बदलाचे संकेत मिळत असून प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी ३१ मार्च रोजी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. या दिवशी ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहनासह काही भागांत गारपीट होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऑरेंज, यलो अलर्ट जारी केल्यामुळे येत्या आठवड्याच्या तापमानात सुमारे ५ अंश सेल्यियस पर्यंत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, सोमवार, दि. ३० रोजी 'यलो अलर्ट' जारी झाला होता. मात्र, शहरात सायंकाळपर्यंत उन्हाचा तडाखा काही कमी झाला नव्हता. सुमारे ३७.२३ इतके तपामान नोंदवले गेले होते. सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सात वाजेच्या सुमारास शहरात विजेच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
दरम्यान, दि. १ व २ एप्रिल रोज देखील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या आठवड्यात तापमानात चढ-उतार येत आहे. सोमवारी ३७.२३ अंश सेल्सिअस नोंद झाले, तर शनिवारी व रविवारी ते अनुक्रमे ३३.२२ व ३३.२१ अंशांवर आले. येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याने या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे तसेच शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके झाकून ठेवण्याचे आवाहन केले आहे.
नागरिकांसाठी सतर्कतेच्या सूचना
वादळी वारे, पाऊस व विजांच्या कडकडाटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अनावश्यक बाहेर पडणे टाळावे तसेच वीजतारा, झाडे व उंच बांधकामांपासून दूर राहावे. मेघगर्जना होत असताना झाडाखाली उभे राहू नये आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके झाकून ठेवावीत, तर जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी हलवावे. हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे