MLA Arjun Khotkar follows up on the electricity issue
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालन्याचे आ. अर्जुनराव खोतकर यांनी शहरी व ग्रामीण भागाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे ग्रामीण भागाचा वीजप्रश्न काही प्रमाणात कमी झाला. याबद्दल आ. अर्जुनराव खोतकर यांचा नागरिकांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
जालना शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि उद्योग क्षेत्र मोठ्या अडचणीत सापडले होते. या गंभीर प्रश्नाची दखल घेत आमदार अर्जुनराव खोतकर यांनी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात हा विषय प्रभावीपणे मांडून शासनाचे लक्ष वेधले.
त्यानंतर आमदार खोतकर यांनी जालना येथे महावितरणच्या वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत कठोर सूचना दिल्या. बैठकीत शहर व ग्रामीण भागातील विविध तांत्रिक अडचणींचा आढावा घेण्यात आला आणि तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
महावितरण प्रशासनाने त्वरित कार्यवाही करत वीजपुरवठा पूर्ववत व सुरळीत करण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून यामुळे *आमदार अर्जुनराव खोतकर यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सगीर अहमद, वसंतराजे जाधव, शिवाजीराव शेळके, योगेश चिरखे, शिवाजीराव नागवे गणेशराव घुले भागवत घुले यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी सांगितले की, जालना शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठा मिळणे ही महावितरणची जबाबदारी आहे. भविष्यात अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल.
सहकार्य करणार
जालना शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा अधिक सक्षम, स्थिर आणि सुरळीत करण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही यावेळी आ. खोतकर यांच्याकडून देण्यात आली