जालना, पुढारी वृत्तसेवा : "तू आम्हाला पसंत नाहीस, येथे राहू नको, नाहीतर जीवे ठार मारू," अशा धमक्या देत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी गीता जगन्नाथ मिठे (३०, हल्ली मुक्काम कोठाळा, ता. घनसावंगी, मूळ रा. सोपारा वाहेगाव, ता. परतूर) यांचे लग्न २७ फेब्रुवारी २०१५ रोजी कोठाळा येथे जगन्नाथ वसंतराव मिठे यांच्यासोबत धार्मिक विधीनुसार झाले होते.
गीता मिठे यांना पती जगन्नाथ यांच्यापासून दोन मुले आहेत. लग्नानंतर सासरच्या लोकांनी केवळ एक महिना गीता यांना बऱ्यापैकी नांदवले. त्यानंतर पती, सासू, सासरा, दीर आणि जाऊ यांनी मिळून तिला किरकोळ कारणावरून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. ८ महिन्यांपूर्वी तिच्या पतीने तिला बळजबरीने घनसावंगी तालुक्यातील कोठाळा येथे तिच्या माहेरी आणून सोडले.
या प्रकरणी गीता मिठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून घनसावंगी पोलिसांनी सोमवार, दिनांक ६ जुलै रोजी पती जगन्नाथ वसंतराव मिठे, सासू मंदाकिनी वसंतराव मिठे, सासरा वसंतराव मारोतराव मिठे, भाया नवनाथ वसंतराव मिठे, दीर रघुनाथ वसंतराव मिठे, जाऊ मुक्ता नवनाथ मिठे, जाऊ अंजली रघुनाथ मिठे (सर्व रा. सोपारा वाहेगाव, ता. परतूर, जि. जालना) आदी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.