वडीगोद्री : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकरांच्या आडून चाली खेळत आहेत. दरेकर आणि सात-आठ जणांनी मराठा क्रांती मोर्चा संपवला. दरेकरांना मदतीला घेत फडणवीस सगळे काही घडवून आणत आहेत, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केला.
तुम्ही टेबलाखाली लपू नका, उगाच नाकातल्या नाकात गुणगुण करू नका. तुमचे शिष्टमंडळ फक्त येते आणि जाते, अशी टीकाही जरांगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली.
अंतरवाली सराटी येथे रविवारी माध्यमांशी बोलताना जरांगे अजित पवारांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही पाठविलेले शिष्टमंडळ फुकटात चहा पिऊन गेले. चहाची उधारी कोण देणार? त्यातही त्यांना शुगर असलेले बिस्कीट नको, खारे बिस्कीट हवे असतात. २० रुपयाला पाण्याची बाटली असते. त्याची उधारी कशी द्यायची? तुमचे शिष्टमंडळ काही कामाचे नाही. मराठा आणि कुणबी एकच आहेत, हे शोधण्याच्या नोंदी का बंद केल्या?, समाजातील युवकांवर असणारा एकही गुन्हा मागे घेतला नाही, याकडे जरांगे यांनी लक्ष वेधले.
गर्दी काय असते हे लवकरच कळेल. मुंबईत गर्दी दाखविली जाईल. मराठा आणि कुणबी एकच आहेत, हे आपण सिद्ध करून दाखवतो, त्यासाठी दरेकर यांनी अंतरवालीत यावे, असे आव्हान जरांगे यांनी दिले.
दरेकर यांनी काही समन्वयकांना हाताशी धरले आहे. समन्वयकांनी त्यांच्या नादाला लागू नये, समाजाच्या नजरेतून ते तुम्हाला उतरवतील. भाजपमधील मराठा नेत्यांनी आता सावध व्हावे. कोणत्याही पक्षाला किंमत देऊ नका, कट्टर व्हा, कट्टर मराठे बना, आपली जात वाचवा, असे आवाहन जरांगे यांनी केले.
आम्हाला राजकारण करायचे नाही. मला कोणताही अहंकार नाही. या विस्तारात दरेकर यांना मंत्री व्हायचे आहे. माझ्या विरोधात बोलणाऱ्याला मंत्री, आमदार केले जाते. अंतरवालीत लाठीचार्ज झाला तेव्हा फडणवीस यांच्या डोक्यात राजकारणाचे भूत घुसले आहे असे का म्हटले नाही, असा सवाल जरांग यांनी केली. त्यांनी खोटेनाटे व्हिडीओ बनवू नयेत. त्यांनी फडणवीस यांच्या बाजूने बोलावे. पण त्यांच्या चुकाही सांगाव्यात, असे आवाहन जरांगे यांनी केले.