मंठा : तालुक्यात यंदा पाऊस जेमतेम पडला असल्याने पिके चांगली जोमात आली होती. मात्र यंदा सुरुवातीपासून मोठा पाऊस न झाल्याने कपाशीसह इतर पिकांची वाढ खुंटली आहे. पावसाळ्याचे जून व जुलै हे दोन महिने पूर्णपणे कोरडे गेले आहेत. तालुक्यातील विहिरींनी तळ गाठल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
तालुक्यात शेकडो हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, अनेक वर्षांनंतर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली असून कपाशी आणि सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल अधिक दिसून आला आहे.
मात्र, खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच नदी, नाले आणि विहिरी कोरड्याठाक पडल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. सोयाबीन आणि कपशीसह सर्वच पिकांना पुढील काळात किमान दोन ते तीन जोरदार पावसाची आवश्यकता आहे.
आधीच वाढलेले खतांचे दर, बियाण्यांचा खर्च आणि मजुरीमुळे उत्पादन खर्च वाढलेला असताना, पाणी उपलब्ध न झाल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. काही शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर सुरू केला आहे. मात्र, सर्वच शेतकऱ्यांना ही सुविधा परवडणारी नाही. शिवाय, विहिरीत पाणीच नसल्याने आधुनिक सिंचन साधनांचाही फारसा उपयोग होत नाही. परिणामी, पिके तग धरतील की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
रब्बी हंगामावर पाण्याचे सावट- तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे पाण्याची टंचाई ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. येत्या काही आठवड्यांत परिस्थिती सुधारली नाही, तर रब्बी हंगामावर पाण्याचे सावट अधिक गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी आशा आणि चिंता अशा दोन्ही टोकांवर उभा असल्याचे चित्र दिसून येत आहे.मारोतराव बोराडे, शेतकरी