पुढारी ऑनलाईन डेस्क : समाजाच्या विनंतीनंतर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे -पाटील यांनी आपले उपोषण आज (दि.२४) स्थगित केले आहे. समाज मागणी करू लागल्याने सलाईन लावून घेतली आहे. परंतु, सलाईन लावून उपोषण करण्यात काहीही अर्थ नाही, असे सांगून विधानसभेला ३० ते ४० आमदार निवडून आणणार, असा निर्धार जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
आपले प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत कुणीही नाही. त्यामुळे विधानसभेत आपले ३० ते ४० आमदार पाठवणार, असे जरांगे यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला १३ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. आता उपोषण सोडून नागरिकांमध्ये जाणार आहे. आरक्षण मिळाल्यावर पहिला गुलाल अंतरवाली सराटीत उडवणार आहे. गाव, समाज सोडून मी कुठेही जाणार नाही. उपोषण हीच माझी खरी ताकद आहे.
२ ते ३ जण फोडाफोडी करत आहेत. त्यांना पुन्हा विधानसभा निवडणुकीत निवडून येऊ देणार नाही, असे सांगून भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना वठणीवर आणणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.